तामिळनाडूत हेड कॉन्स्टेबल रेवतीने नऊ पोलिसांना फाशीच्या तख्तावर पोहोचवले!

नोकरीची हमी, कुटुंबाच्या संरक्षणाची चिंता असतानाही केले धाडस

तामिळनाडूत हेड कॉन्स्टेबल रेवतीने नऊ पोलिसांना फाशीच्या तख्तावर पोहोचवले!

तामिळनाडूमधील एका अत्यंत चर्चित प्रकरणात, कोठडीतील छळामुळे वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल न्यायालयीन दृष्ट्या निर्णायक असला, तरी हे प्रकरण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यामागे कनिष्ठ दर्जाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे, हेड कॉन्स्टेबल रेवती, ?यांचे धाडस महत्त्वाचे ठरले.

रेवती त्या वेळी तूतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलम पोलीस ठाण्यात ड्युटीवर होत्या, जिथे २०२० मध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करून मोबाईल दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात ‘अप्रूव्हर’ (साक्षीदार) बनत रेवती यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटना सांगितली. स्वतःची, कुटुंबाची किंवा नोकरीची कोणतीही हमी नसतानाही त्यांनी सत्य मांडण्याचा निर्णय घेतला. आरोपी पोलीस अधिकारी वरिष्ठ आणि प्रभावशाली होते, तर रेवती एक कनिष्ठ कॉन्स्टेबल होत्या तरीही त्या ठाम राहिल्या.

रेवती यांनी सांगितले की, त्या रात्री पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीचे त्यांनी मिनिटागणिक वर्णन केले. दोघांनाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली, त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला, ज्यामुळे देशभर संताप उसळला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पोलिसांची त्यांनी निर्भयपणे ओळख पटवली, ज्यामुळे गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करण्यात मदत झाली. त्यांच्या साक्षीनुसार, आरोपी पोलिसांनी उपलब्ध असलेल्या वस्तूंनी मारहाण केली, इतकेच नव्हे तर बूट घालून त्यांच्या खासगी अवयवांवरही पाय ठेवले. मध्येच ते दारू पिण्यासाठी थांबत होते.

त्या म्हणाल्या, “मी सुमारे रात्री ८.५० वाजता ठाण्यात पोहोचले. तेव्हा आतून ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत होते — ‘आई, खूप दुखतंय! मला सोडा! कृपया सोडा! माझी चूक झाली!’ असे ते ओरडत होते. यामध्ये सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन यांचा आवाजही ऐकू येत होता — ‘पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याची हिंमत कशी झाली?’”

“मी पोहोचले तेव्हा त्या व्यक्तीला इतक्या जोरात मारहाण केली जात होती की त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते… नंतर मारहाण संपल्यावर त्याच जखमी व्यक्तीकडून जमिनीवरील रक्त साफ करून घेतले,” असेही त्यांनी सांगितले.

जेव्हा दोघे अर्धबेशुद्ध अवस्थेत होते, तेव्हा रेवती यांनी जयराज यांना काही हवे का असे विचारले आणि त्यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कॉफी पोलिसांनी लगेच फेकून दिली. एका क्षणी जेव्हा त्यांना नग्न करून हात बांधले गेले, तेव्हा हा क्रूर प्रकार पाहवत नसल्याने रेवती खोलीबाहेर गेल्या.

हे ही वाचा:

‘बाहुबली २’ला मागे टाकत ‘धुरंधर २’कडून १००० कोटींचा टप्पा पार

होर्मुझ नियंत्रण, नुकसान भरपाई; काय आहे इराणचा १०-कलमी प्रस्ताव?

अमेरिका इराण युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी उघडणार

ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी भव्य टीबीएम

सहकारी पोलिसांनी गप्प राहण्याचा सल्ला दिला तरी, ३७ वर्षांच्या रेवती यांनी सत्य मांडण्याचा निर्णय घेतला. त्यांना धमक्या आणि दबावाला सामोरे जावे लागले. वातावरण इतके तणावपूर्ण होते की, न्यायाधीशांना चौकशी कक्षाबाहेर सुरक्षा रक्षक ठेवावा लागला. पोलिस कर्मचारी बाहेर जमून वक्तव्यांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते.

सुरुवातीला रेवती यांनी आपल्या जबाबावर सही करण्यास टाळाटाळ केली, पण वारंवार संरक्षणाची हमी दिल्यानंतर त्यांनी सही केली. न्यायमूर्ती भारतीदासन यांनी आपल्या अहवालात नमूद केले की, “दीर्घ समजावणुकीनंतर आणि संरक्षणाची खात्री दिल्यानंतरच त्यांनी सही केली. त्या वेळी संपूर्ण पोलीस ठाणे पोलिसांनी वेढलेले होते, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते आणि कोर्ट कर्मचाऱ्यांनाही धमकावले जात होते.”

या प्रकरणाच्या सुरुवातीला रेवती यांच्या साक्षीला मोठा पाठिंबा मिळाला, तरीही त्या चिंतेत होत्या. २०२० मध्ये त्यांनी सांगितले होते, “मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होऊ नये.”

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांना संरक्षण दिले. त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सुरक्षिततेची हमी दिली.

Exit mobile version