आय-पॅक या राजकीय सल्लागार कंपनीचे सह-संस्थापक विनेश चंडेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीने चंडेल यांना दिल्लीत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) ताब्यात घेतले. ईडीने २ एप्रिल रोजी दिल्लीतील त्यांच्या मालमत्तेव्यतिरिक्त, आय-पॅकचे दुसरे सह-संस्थापक ऋषी राज सिंह यांच्या बंगळूरमधील आणि आम आदमी पक्षाचे (आप) माजी संपर्क प्रभारी विजय नायर यांच्या मुंबईतील मालमत्तांवरही छापे टाकले होते.
ईडीने दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे चौकशी सुरू केली. आतापर्यंतच्या तपासात आय-पॅककडून आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या विविध पद्धतींचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यात हिशोबी व बिनहिशोबी निधी प्राप्त करणे, कोणत्याही व्यावसायिक कागदपत्रांशिवाय असुरक्षित कर्ज घेणे, बनावट बिले व इनव्हॉइस तयार करणे, तृतीय पक्षांकडून निधी घेणे आणि आंतरराष्ट्रीय हवाला मार्गे रोख व्यवहार करणे यांचा समावेश आहे. तपासात हेही उघड झाले आहे की आय-पॅक कोट्यवधी रुपयांच्या गुन्हेगारी पैशांच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभागी होती. आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान व्यवहारांशी संबंधित विविध व्यक्तींची विधाने नोंदवण्यात आली आहेत. झडतीही घेण्यात आली असून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात विनेश चंदेल यांची भूमिका समोर आली आहे. संबंधित कायद्यांनुसार, कंपनीच्या संचालकांना गुन्हा त्यांच्या संमतीने, संगनमताने किंवा निष्काळजीपणामुळे झाल्यास जबाबदार धरले जाते.
अटकेनंतर विनेश चंदेल यांना पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी सोमवारी उशिरापर्यंत चालली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेफाली बरनाला टंडन यांनी त्यांना १० दिवसांच्या कोठडीत पाठवले. ईडी आता पुढील चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करणार आहे.
हे ही वाचा:
इराणसोबतच्या व्यापारात हस्तक्षेप नको!
झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक
अयोध्या राम जन्मभूमी मंदिरातील ‘ज्योती स्वरूप’वरून वाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलिओ पथकाला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांवर हल्ला
दरम्यान, टीएमसी नेते अभिषेक बनर्जी यांनी विनेश चंदेल यांच्या अटकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, पश्चिम बंगाल निवडणुकांपूर्वी सुमारे १० दिवस आधी आय-पॅकचे सह-संस्थापक विनेश चंदेल यांची अटक ही केवळ चिंताजनक नाही, तर ‘समान संधी’च्या तत्त्वालाही धक्का देणारी आहे. जेव्हा पश्चिम बंगाल मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांकडे वाटचाल करत आहे, अशा वेळी अशी कारवाई हा संदेश देते की, जर तुम्ही विरोधकांसोबत काम करत असाल, तर तुम्ही पुढील लक्ष्य ठरू शकता. हे लोकशाही नसून भीती निर्माण करणारी परिस्थिती आहे.
