मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरात नागरिकांचा जीव मुठीत

ट्रक, मिस्करने रस्ते अडवले पण पालिका, पोलिस ढिम्म

मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरात नागरिकांचा जीव मुठीत

मुंबईत सगळीकडे सुरू असलेल्या बांधकामांमुळे होणारा त्रास हा प्रचंड आहे. प्रदूषण, बांधकामासाठी आणले जाणारे महाकाय सामान, रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिकांचा छळ सुरू आहे. मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची अशीच वाईट अवस्था आहे. रस्त्यावर उभे ट्रक, त्यामुळे उडणारी धूळ, या सततच्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यांची झालेली अवस्था यामुळे लोक चिडलेले आहेत. तक्रारी केल्या आहेत पण आता लोकांचा जीव गेल्यावरच काही कारवाई होणार का असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.

या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या जोड रस्त्यावर रोज मिक्सर, अवजड सामानाने भरलेले ट्रक उभे असतात. त्यामुळे त्या रस्त्यावर चालणेही मुश्किल होते. इतर वाहनेही त्याच रस्त्यावरून धावत असतात. परिणामी, अपघात होण्याची शक्यता असते. फुटपाथवरून चालणेही अशक्य असते. तिथेही आसपास चाललेल्या कामासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक बसलेले असतात शिवाय हा फुटपाथ इतका चिंचोळा आहे की तिथून दोन माणसे एकाचवेळी व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालावे लागते पण या ट्रकमुळे लोकांना रस्त्यावर चालताही येत नाही.

या संदर्भात त्या परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. शिवाय इतर पादचाऱ्यांनाही त्रास होतो तो वेगळा.
या जोड रस्त्यांची दुरवस्था तर बघवत नाही. पावसात तर तिथे साचत असलेल्या पाण्यामुळे लोकांना चालणेही कठीण होते. पावसाळा गेला तरी ते खड्डे तसेच राहिलेले आहेत. लोकांना त्याच खड्ड्यातून जावे लागते. विशेषतः वयोवृद्ध, ज्येष्ठ, महिला, मुले यांना जास्त धोका पत्करून चालावे लागते.

या मिस्कर, ट्रक यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास परिसरात सगळ्यांनाच होतो.  या रस्त्यावरून चालताना नाकावर रुमाल धरल्याशिवाय पर्याय नाही. इतकी धूळ या ट्रक्सच्या येण्याजाण्यामुळे रोज उडत असते. शिवाय या ट्रक्सच्या आवाजाचा त्रास सहन होण्यापलीकडे आहे. घराच्या खिडक्या लावल्या तरी त्या आवाजाने लोक त्रस्त आहेत. या स्टेशनच्या अवतीभवती अनेक इमारतींची कामे सुरू असल्यामुळे धुळीचे साम्राज्य तिथे पसरलेले आहे. त्या प्रदूषणामुळे लोक भयंकर त्रस्त आहेत. खोकला, डोकेदुखी, डोळ्यांचे, त्वचेचे विकार याच्या तक्रारी आता नव्या राहिलेल्या नाहीत.

हे ही वाचा:

अर्थमंत्री मांडणार आज देशाचा अर्थसंकल्प

सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री

पूर्व कांगोतील कोल्टन खाण कोसळली

नागपाड्यात दोन गटांत हाणामारी; पाच जखमी, १२ जणांना अटक

याबाबत कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जयराज रणवरे यांना न्यूज डंकाने संपर्क साधला तेव्हा त्यांनी यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले शिवाय गाडी पाठवून त्या परिसरात अशा गाड्या उभ्या आहेत का याची खातरजमा केली. पण तरीही हा त्रास कमी झालेला नसल्याची लोकांची तक्रार आहे. पोलीस गस्त घालतात तेवढ्यापुरता त्रास कमी झाल्याचे दिसते पण परिस्थिती तशी नसते. पालिका अधिकाऱ्यांनीही हात वर केले असून कोणतीही कारवाई पालिका करताना दिसत नाही.

हे काम किती काळ चालणार, लोकांनी हा त्रास का सहन करायचा, किती वेळ सहन करायचा असे प्रश्न लोक विचारत आहेत. या ट्रक्सचे व्हीडिओ काढून ते पोलीस ठाणे आणि पालिका अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत. आता त्यावर कशापद्धतीची कारवाई होते याचे उत्तर लोकांना हवे आहे. ही सगळी मिलीभगत आहे असा आरोपही आता लोक करू लागले आहेत.

Exit mobile version