मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरात मंगळवारी रात्री एका थरारक घटनेने खळबळ उडाली. दामोदर पार्क परिसरातील बागेत खेळणाऱ्या सात वर्षांच्या दोन चिमुरड्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. एका ३४ वर्षीय नराधमाने या मुलींना जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेकडील दामोदर पार्क येथील मैत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बागेत मंगळवारी (१७ मार्च) रात्री ९ च्या सुमारास दोन सात वर्षांच्या मुली खेळत होत्या. यावेळी ३५ वयोगटातील एक संशयित इसम बागेत घुटमळत होता. त्याने अचानक एका मुलीला हुमेरा कडेवर उचलले आणि दुसरीचा हिचा हात धरून तिला ओढत बागेबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्याच वेळी सोसायटीतील रहिवासी मोहम्मद जकारिया शमसी हे कामानिमित्त आपली मोटार काढण्यासाठी खाली आले होते. समोरचा प्रकार पाहून त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला हटकले आणि मोठ्याने आरडाओरडा केला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने मुलींना सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शमसी यांनी त्यांचे मित्र अयान खान आणि तहा शेख यांच्या मदतीने पाठलाग करून आरोपीला बागेच्या गेटवरच पकडले.
हे ही वाचा:
ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या ममता सरकारला फटकारले
पंतप्रधान मोदींची कुवैतच्या युवराजांशी चर्चा
स्थानिक नागरिकांनी विचारपूस केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तातडीने पार्कसाईट पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरजुप्रसाद केशुलाल बनवासी (३४) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्याचा रहिवासी आहे.”आरोपीला अटक करण्यात आली असून, तो या मुलींना नेमका कुठे आणि कोणत्या उद्देशाने घेऊन जात होता, याचा तपास सुरू आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली
पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुमित सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, मोहम्मद शमसी आणि त्यांच्या मित्रांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
