जीएसटी : २.० मोदींच्या बूस्टर डोसमुळे अर्थकारणाला चढला गुलाबी रंग

हे अच्छे दिन सुखावणारे आहेत.

जीएसटी : २.० मोदींच्या बूस्टर डोसमुळे अर्थकारणाला चढला गुलाबी रंग

भारतीय अर्थकारणाला डेड इकोनॉमी म्हणत नाके मुरडणाऱ्यांचे तोंड काळे झाले आहे. केंद्र सरकारने जीएसटी सुधारणा जाहीर केल्या. जीएसटी २.० ने भारतीय अर्थकारणाला एक जबरदस्त असा ‘बूस्टर डोस’ दिलेला आहे. उत्पादनांचे दर कमी झालेले आहेत. मध्यमवर्गीय ग्राहकांना किमतीत मोठा दिलासा मिळाला असल्यामुळे देशांतर्गत मागणीत दणदणीत वाढ झालेली आहे. जीएसटी २.० लागू झाल्यापासून म्हणजे २२ सप्टेंबरपासून अर्थकारणाने अचानक उसळी घेतली असून ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीत दणदणीत वाढ झालेली आहे. ही वाढ अनेक ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत झालेली आहे.

वाहनांच्या आणि इलेक्ट्रॉनिक्स कारच्या दरात जीएसटी २.० मुळे मोठा फरक पडलेला आहे. थेट १० टक्क्यांची बचत आहे. ही बचत मोठी असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात जास्त पैसा खुळखुळतो आहे. लोकांनी नवे जीएसटी दर लागू होईपर्यंत म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत लोकांनी खरेदी टाळली. त्यामुळे सप्टेंबरच्या पहील्या तीन आठवड्यात बाजारात फार उलाढाल नव्हती. परंतु नवरात्रीत मात्र हे चित्र बदलले. पहील्या दिवसापासून लोकांची दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दृश्य दिसू लागले. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कार, एसयूव्हीची विक्री वाढली. नवरात्री नंतर दिवाळी आहे. त्यामुळे पुढचा महिनाभर तरी ही विक्री जोरदार असेल. दुकानदार, स्टॉकीस्ट, कंपन्या, गुंतवणूकदार सगळेच पैसे कमावणार आहेत. एकूण अर्थकारणाचे चक्र वेगाने फिरणार आहे.

हे ही वाचा:

भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’

सकाळी पोट साफ होत नाही?

पीओकेमध्ये हिंसक आंदोलन; पाक सैन्याच्या गोळीबारात १२ ठार!

तामिळनाडूत डीएमकेची अरेरावी, शाळेत शाखा प्रशिक्षण, पूजा केली म्हणून स्वयंसेवकांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू करून देशाच्या करप्रणालीचे सुसुत्रीकरण केले. आता जीएसटी २.० लागू करून देशाच्या अर्थकारणाला गती दिली. मोदी हे अर्थतज्ज्ञ नाहीत. परंतु त्यांच्या काळात देशाच्या अर्थकारणाने जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावरून ४ स्थानावर झेप घेतली. फ्राजिक इकोनॉमी असा बदलौकीक संपवला. देशाला मजबूत अर्थकारण दिले. जीएसटी हा मोदींचा मास्टर स्ट्रोक होता. यूपीएच्या काळात जे डॉ.मनमोहन सिंह यांना जमले नाही ते मोदींनी करून दाखवले. याबाबत सर्व राज्यांमध्ये सहमती बनवणे सोपे नव्हते. हा करीष्मा त्यांनी करून दाखवला. त्याची गोमटी फळे देशाला चाखायला मिळतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरीफ युद्ध भारतावर लादले होते. त्याचे उत्तर देशाच्या जनतेने दिलेले आहे. हा देश डेड इकोनॉमी व्हावा ही केवळ ट्रम्प यांची उक्ती नव्हती, ती त्यांची इच्छाही होती. भारतात ही इच्छा बाळगणारा एक नेता असावा हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव, परंतु राहुल गांधी यांनीही ही उक्ती उचलून धरली. जीएसटी २.० हे देशाच्या अर्थकारणासाठी वरदान ठरणार असे स्पष्ट झालेले आहे. देशाच्या अर्थकारणाची गती सुसाट वाढणार आहे.

जीएसटी कौन्सिलने लहान कार आणि ३५० सीसी (cc) पर्यंतच्या बाईकववरील जीएसटी दर २८% वरून थेट १८% पर्यंत कमी केला. त्यामुळे किमतीत थेट १० टक्क्यांचा फायदा होतो आहे. त्यात सणावाराचा काळ असल्यामुळे लोकांच्या उत्साहाला उधाण आलेले आहे.

या आधी मोदींनी करदात्यांना उत्पन्नात घसघशीत सुट दिली. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. त्यानंतर जीएसटी सुधारणा आणल्या. जीएसटी २.० म्हणजे लोकांसाठी दुधात साखर ठरते आहे. देशातील मध्यमवर्ग हा भाजपाचा मतदार आहे. परंतु मोदी मध्यमवर्गासाठी काही करीत नाहीत, असा आक्षेप वारंवार घेतला जात होता. मोदींनी त्याचे उत्तर आपल्या कृतीतून दिलेले आहे. हे उत्तर जनतेला सुखावणारे आहे.
श्रावण महीन्यापासून थेट डिसेंबरपर्यंतचा काळ हा सणावाराचा, नवरात्रीनंतर दिवाळी येते हा काळ लग्नसराईचाही असतो. या काळात लोक आपले हात मोकळे सोडतात. बाजारात गर्दी करतात. यंदाच्या वर्षी लोकांना जीएसटी सुधारणा होणार हे माहित असल्यामुळे लोक वाट पाहात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा केली. त्यामुळे या सुधारणा प्रत्यक्षात येईपर्यंत लोक थांबले होते. त्यामुळे काही काळ दुकाने, मॉलमध्ये सन्नाटा होता. मामला थोडा थंडा होता. २२ सप्टेंबरपासून मात्र हे चित्र बदलले. लोकांनी जीएसटी २.० चा पुरेपुर फायदा घेतला. बाजारात गर्दी वाढली, उलाढाल वाढली. हे जे काही चित्र दिसते आहे, ते भारतासाठी एकूणच आशादायी चित्र आहे. जगभरात मंदीचे सावट असताना भारतात अर्थकारणाला गुलाबी रंग चढलेला दिसतो. केंद्र सरकारच्या धोरणाचा त्याच महत्वाचा वाटा आहे. एक चहावाल्याने अर्थकारणाला असे काही टॉनिक दिले आहे की, अर्थकारण वेगाने धावू लागले आहे. ट्रम्प यांच्या टेरीफ नीतीमुळे भारताच्या अर्थकारणाला मार बसणार अशी भाकीत काही नतद्रष्ट करीत होते. त्यांचे थोबाड फुटले आहे.
कार आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही (Compact SUVs) ची मागणी वाढली. ग्राहकांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत खरेदी थांबवली होती. जीएसटीतील कपातीमुळे २२ सप्टेंबरनंतर बाजारात मोठी उसळी दिसून आली.
देशी बाजारात टाटा मोटर्सची सप्टेंबर २०२५ मध्ये जोरदार विक्री झालेली आहे. चार चाकी वाहनांची विक्रीचा आकडा ५९ हजार ६६७ झालेला आहे. कंपनीच्या नेक्सन या इलेक्ट्रीक कारची विक्री ९६ टक्क्यांनी वाढून ९१९१ झालेली आहे.
महींद्रा एण्ड महिंद्राच्या एसयूव्ही कारच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत ६० टक्के वाढ झालेली आहे. एकूण कारची विक्री ५६ हजार २३३ आहे.

मारुती सुझुकीच्या विक्रीत घट झाली असली तरी सप्टेंबरमध्ये ३ लाख ५० हजार कारची बुकींग झालेली आहे. ह्युडई कारच्या विक्रीत १० टक्के वाढ झालेली आहे. एकूण छोट्या कार आणि एसयूव्हीचा विचार करता एकूण कारची विक्री ७० हजार ३४७ झालेली आहे. बाइक्स आणि स्कूटरवरील जीएसटी २८% वरून १८% केल्याने ग्रामीण आणि मध्यमवर्गीय खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला.

इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीतही मोठी वाढ दिसते कारण इथेही जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्यामुळे १० टक्क्यांची बचत आहे. टीव्ही, एसीच्या किंमतीत घसघशीत घट झाली आहे. मोबाईलच्या किमती कमी झाल्या नसल्या तरी एकूणच जी बचत झाली आहे, त्याचा फायदा मोबाईल विक्रेत्यांनाही मिळतो आहे. इलेक्ट्रॉनिक्स डीलर्सनी सणासुदीच्या काळात २५% ते ३०% विक्री वाढीची अपेक्षा केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लहान शहरांमधील म्हणजे टीयर २ आणि ३ शहरांमध्ये मोठ्या शहरांपेक्षा जास्त खरेदी दिसते आहे. ग्रामीण आणि निम-शहरी भागातील क्रयशक्तीत वाढ झाल्याचे हे लक्षण आहे.

जीएसटी सुधारणा केवळ देशांतर्गत विक्रीसाठीच नव्हे, तर निर्यात वाढीसाठी आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. भारतामध्ये जास्त ३५० सीसीच्या बाईक्स वापरल्या जातात. हिरो स्पेंडर, होंडा एक्टीव्हा, रॉयल एन्फील्ड क्लासिक या बाईक १० टक्के स्वस्त झाल्या आहेत. ही कपात साधारण सात हजार ते १८ हजारपर्यंत आहे. ग्रामीण भागात ही विक्री ७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बजाज ऑटो, हिरो मोटर कॉर्पच्या विक्रीत अनुक्रमे ९ आणि ८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

अर्थकारणाला जी गती आलेली दिसते, त्यात ग्रामीण भारताचे योगदान भरीव आहे. देशातील सर्वसामान्य माणूस अर्थकारणाला मजबूती देताना दिसतो आहे. हे अच्छे दिन सुखावणारे आहेत. याचे पडसाद शेअर बाजारातही उमटल्याशिवाय राहणार नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version