पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, या युद्धामुळे जागतिक स्तरावर मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले आहे आणि त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. त्यांनी म्हटले की परिस्थिती आव्हानात्मक असली तरी भारत सातत्याने कूटनीतिक प्रयत्नांद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत पश्चिम आशियातील सर्व प्रमुख देशांच्या संपर्कात आहे. त्यांनी या भागातील राष्ट्रप्रमुखांशी दोन वेळा दूरध्वनीवर चर्चा केली असून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबतही सतत संवाद सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येच्या समाधानासाठी भारताने संवादाचा मार्गच सुचवला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनीमध्ये मोठ्या संख्येने जहाजे अडकून पडली आहेत, ज्यामध्ये भारतीय खलाशीही आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये अशा प्रकारची अडचण निर्माण होणे आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आपल्या जहाजांच्या सुरक्षित हालचालीसाठी सातत्याने कूटनीतिक प्रयत्न करत आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की भारताने नागरिक, नागरी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. कोणताही हिंसक संघर्ष मानवतेच्या हिताचा नसून सर्व पक्षांनी शक्य तितक्या लवकर शांततेच्या मार्गावर यावे, असे भारताचे मत आहे.
हे ही वाचा:
८ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलवी मोहम्मद इस्माईलला चोपले
चीन- पाक सीमेजवळ ‘पिनाका’ची वाढती तैनाती! २२ रेजिमेंट्सच्या तैनातीचे लक्ष्य
हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांनाच मिळणार अनुसूचित जातीचा दर्जा
कोलंबियामध्ये लष्करी C-130 विमान कोसळून ६६ जणांचा मृत्यू
विदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. या संकटादरम्यान आतापर्यंत ३,७५,००० हून अधिक भारतीय सुरक्षितपणे परतले आहेत. केवळ इराण मधूनच १,००० पेक्षा जास्त भारतीय परतले असून त्यामध्ये ७०० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आहेत. पंतप्रधानांनी हे ही सांगितले की, या संघर्षादरम्यान काही भारतीयांचा मृत्यू झाला असून काही जखमी झाले आहेत. प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जात असून जखमींना उत्तम उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार या कठीण काळात संवेदनशीलतेने काम करत असून परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ऊर्जा पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती दिली की अलीकडच्या काळात विविध देशांमधून तेल आणि एलपीजीने भरलेली अनेक जहाजे भारतात पोहोचली आहेत. भविष्यातही देशाच्या गरजांशी संबंधित सर्व आवश्यक वस्तू सुरक्षितपणे भारतात पोहोचतील, याची सरकार काळजी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
