बदलापूरकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूर शहरात लागू करण्यात आलेली 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, 1 ऑगस्ट 2026 पासून शहरातील सर्व भागांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांतील पाणीसाठा आणि जलपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, जुलैच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात अपेक्षेपेक्षा मोठी वाढ झाली. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने परिस्थितीचा नव्याने आढावा घेत पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जल व्यवस्थापन उपविभाग, कुळगाव–बदलापूर यांनी जारी केले आहे.
हे ही वाचा:
१५ टक्के पाणी कपात अखेर रद्द
‘मोदीजी. तुम्ही आमच्या मुलीला नवे जीवन दिलेत!’
पंतप्रधान मोदी ‘अपयशी’; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!
पाणी कपात रद्द करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून वस्तुस्थिती मांडली. विशेषतः नगरसेवक अरुण सुरवळ यांच्या प्रभागात पाणीपुरवठ्याची समस्या अधिक तीव्र असल्याने त्या भागातील नागरिकांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणी कपात रद्द झाल्यामुळे आता संपूर्ण बदलापूर शहरातील नागरिकांना नियमित, सुरळीत आणि अखंड पाणीपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बदलापूर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे नद्या, ओढे आणि धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाले आहेत. या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक आणि पर्यटक धबधब्यांकडे गर्दी करत आहेत. मात्र, वाढलेला पाण्याचा वेग आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, धबधबे व नदीकाठच्या परिसरात जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
