हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा

सोशल मीडिया साइट्सवरील बंदीविरोधात सुरू असलेल्या निदर्शनाला हिंसक वळण

हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा

नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी निदर्शने केल्यानंतर आता मंगळवार, ९ सप्टेंबर रोजीही निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांना हिंसक वळण मिळून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. सोमवारी पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली असली तरी निदर्शकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. अशातच आता पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे.

राजीनामा देण्याच्या काही तास आधी, ओली यांनी निदर्शकांना शांतता राखण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले होते, संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यांनी या संकटाचे निराकरण करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणाही केली होती. “कोणत्याही प्रकारची हिंसाचार राष्ट्रीय हिताचा नाही, आपण शांततापूर्ण संवाद आणि चर्चा स्वीकारली पाहिजे,” असे ओली यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांनंतर पंतप्रधानांनी माघार घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी अनेक मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नेपाळच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान केपी ओली यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. लष्करप्रमुखांनी सांगितले की, नेपाळमधील परिस्थिती हाताळणे आता त्यांच्यासाठी कठीण होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. निदर्शकांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या खाजगी घराला आग लावल्याची माहिती असून निदर्शक विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसूनही तोडफोड केली.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदी यांचा पंजाब दौरा कौतुकास्पद

वैश्विक टपाल क्षेत्र बळकटीसाठी भारताचे काय आहे पाउल ?

राजस्थानमध्ये बेकायदेशीर धर्मांतराच्या कारवाईचा कट उधळत दोघांना ठोकल्या बेड्या

भोपाळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

तीन दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने फेसबुक, एक्स यासह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. यानंतर नेपाळमध्ये गोंधळ उडाला. सरकार आणि निदर्शक आमनेसामने आले. हिंसाचार उसळून येताच सरकारने बंदी उठवली. तसेच मंत्र्यांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना निषेध थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, मंगळवारीही निदर्शने सुरूचं आहेत. निदर्शकांनी वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या घरांना आणि कार्यालयांनाही लक्ष्य करणे सुरूच ठेवले. मंगळवारी त्यांनी नेपाळच्या संसदेला आग लावली आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांच्याही खाजगी निवासस्थानांची तोडफोड केली. निदर्शकांनी मंत्र्यांची घरे असलेल्या सिंह दरबारवरही हल्ला केला.

Exit mobile version