पाकिस्तानने पंजाब प्रांताचा वापर शेजारील देशाविरोधात केला! काय म्हणाले बलोच नेते?

शाहबाज शरीफ यांच्या भाषणानंतर बलुच नेते मीर यार बलोच यांनी डागले टीकास्त्र

पाकिस्तानने पंजाब प्रांताचा वापर शेजारील देशाविरोधात केला! काय म्हणाले बलोच नेते?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर भारताविरुद्ध गरळ ओकण्यासाठी केला. तसेच पाकिस्तान कसा दहशतवादाविरोधात लढत आहे हे दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. शाहबाज यांनी जगाला असेही सांगितले की, पाकिस्तान शांतता, न्याय आणि विकासासाठी उभा राहील. यानंतर भारताने पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतलाच पण आता पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणाला त्यांच्याच देशातील बलुचिस्तानच्या नेत्यांनीही विरोध करत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले आहे.

बलुच नेते मीर यार बलोच म्हणाले की, पाकिस्तानने स्थापनेपासूनच आपल्या पंजाब प्रांताचा वापर हा शेजारील देश आणि जागतिक शक्तींविरुद्ध केला नाही तर बलुचिस्तान प्रजासत्ताक सारख्या सार्वभौम राज्यावर जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, असे ते म्हणाले. पुढे मीर म्हणाले की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भागीदार असल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात त्यांचेच सैन्य आणि डीप स्टेट आयसिस आणि अल-कायदाला सुरक्षित आश्रय देत आहेत.

मीर यार बलोच यांनी शाहबाज शरीफ यांना कठपुतळी पंतप्रधान म्हटले आणि शरीफ यांनी बलुचिस्तानमधील परिस्थितीबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला अंधारात ठेवले, असा आरोप त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानला विचारले पाहिजे की त्यांनी ऑगस्ट महिन्यात बलुचिस्तानमध्ये इंटरनेट का बंद केले, ज्यामुळे त्यांच्या ६ कोटी बलुचिस्तानमधील लोकांना जगापासून तोडले गेले. बलुचिस्तानच्या ६ कोटी लोकांना त्यांच्या राष्ट्रीय भाषेत वाचण्याची किंवा लिहिण्याची परवानगी नाही. बलुचांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले जाते. बलुच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून रोखले जाते. डॉक्टरांना लक्ष्य केले जाते. बलुच वकिलांचे न्यायालयातून अपहरण केले जाते आणि बनावट चकमकीत मारले जाते. शांततापूर्ण रॅली आणि निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल शिक्षा म्हणून बलुच मुले आणि महिलांना गोळ्या घातल्या जातात, अशी परिस्थिती त्यांनी मांडली.

महासभेतील भाषणात शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. याला प्रत्युत्तर देताना मीर यार म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या जिहादी गटांचे कौतुक करणे हे पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकिस्तानचेच लोक होते याचा पुरावा आहे. त्यांनी खैबर पख्तूनख्वा येथे पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यांचा उल्लेख केला ज्यामध्ये सुमारे ३० लोक ठार झाले.

हे ही वाचा : 

खालिस्तानी दहशतवादी परमिंदर सिंग पिंडीचे यशस्वी प्रत्यार्पण; युएईमधून आणले भारतात

पाकची नाटकं; दहशतवाद पोसण्याचे तथ्य लपवू शकत नाहीत!

दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लक्ष रुपयांची मदत!

हिंदू राष्ट्रात M फॉर Mahadev च चालणार…

पहलगाम घटनेसाठी पाकिस्तानला जबाबदार धरत ते म्हणाले की, ही घटना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या भाषणानंतर लगेच घडली, ज्यामध्ये २६ निःशस्त्र, निष्पाप पर्यटक मारले गेले. त्यांनी पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रांना खोटे बोलल्याचा आरोप करत म्हटले की, स्थापनेपासून पाकिस्तानने दहशतवादाशी लढा दिला नाही, तर दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, त्यांना निधी आणि वैचारिक प्रशिक्षण दिले आहे. अल-कायदाचा नेता (ओसामा बिन लादेन) याला १५ वर्षे आयएसआयच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरक्षा देणे हे पाकिस्तानच्या दहशतवादासोबतच्या सहभागाचा पुरावा आहे.

Exit mobile version