दक्षिण लेबनॉनमधील स्फोटात संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाच्या दोन शांतता सैनिकांचा मृत्यू

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत केला निषेध

दक्षिण लेबनॉनमधील स्फोटात संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाच्या दोन शांतता सैनिकांचा मृत्यू

लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाने (UNIFIL – युनिफिल) सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) पुष्टी केली की, दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या स्फोटात त्यांचे दोन शांतता सैनिक ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासांत मोहिमेच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित ही दुसरी प्राणघातक घटना आहे. शांततेच्या कार्यात सेवा बजावताना कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये, असे युनिफिलने म्हटले आहे. दरम्यान, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शांतता सैनिकांची सुरक्षा आणि संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य राहिले पाहिजे यावर भर दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश म्हणाले, “शांतता सैनिक कठीण परिस्थितीत सेवा बजावतात आणि संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या पाठिंब्याने त्यांना संघर्षग्रस्त भागांमध्ये तैनात केले जाते. शांतता मोहीम म्हणजे कृतीतील बहुपक्षीयता होय. शांतता सैनिकांची सुरक्षा आणि संरक्षण हे प्राधान्य असले पाहिजे.” उत्तरदायित्व बळकट करण्यामधील भारताच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि नमूद केले की, नवी दिल्लीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव २५८९ पुढाकार घेऊन मांडला होता, ज्याद्वारे शांतता सैनिकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी उत्तरदायित्वाची मागणी करण्यात आली आहे. “युनिफिलमध्ये तैनात असलेल्या संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यात भारत आंतरराष्ट्रीय समुदायात सामील होत आहे. आम्ही शहीद झालेल्या ‘ब्लू हेल्मेट्स’ना श्रद्धांजली अर्पण करतो,” असे ते पुढे म्हणाले.

रविवारी दक्षिण लेबनॉनमधील अदचित अल कुसैरजवळ संयुक्त राष्ट्रांच्या एका तळावर क्षेपणास्त्र आदळल्याने एक शांतता सैनिक ठार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या लेबनॉनमधील अंतरिम दलाने दिल्यानंतर ही टिप्पणी करण्यात आली आहे. युनिफिलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, क्षेपणास्त्राचा स्त्रोत अद्याप अज्ञात असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, हुतात्मा शांतता सैनिकाच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमी जवानांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली.

हे ही वाचा:

इराणहून भारताकडे जाणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला

दहशतवादी मसूद अझरच्या भावाचा पाकिस्तानात मृत्यू

काच, स्टील की तांबे… पाणी पिण्यासाठी कोणती बाटली अधिक चांगली?

सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी

एका स्वतंत्र निवेदनात, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनने पुनरुच्चार केला की, संयुक्त राष्ट्रांमधील शांतता मोहीम ही बहुपक्षीय सहकार्याचे प्रत्यक्ष उदाहरण असून ती आव्हानात्मक परिस्थितीत पार पाडली जाते. त्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले.

Exit mobile version