पाकिस्तानची सध्याची परिस्थिती म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशीच आहे. अर्थकारण पूर्ण कोलमडलेले, चलन घसरलेले, महागाई आटोक्याबाहेर गेलेली, आणि जनतेच्या हातात कामधंदा नाही. अशा वेळी जबाबदार नेतृत्व काय करेल? तर घरातली परिस्थिती सुधारेल, उद्योगधंद्यांना चालना देईल, शेजाऱ्यांसोबत संबंध सुधारण्यावर भर देईल. पण पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणे वेगळाच मार्ग धरला आहे तो म्हणजे अफगाणिस्तानाविरुद्ध युद्धाचा..
भारत विरोधी कुरापती हा त्यांचा जुना छंद. सीमारेषेवर तणाव निर्माण करायचा, आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रस्ताळेपणा करायचा, आणि मग स्वतःला “पीडित” म्हणवून घ्यायचे. पण गेल्या काही वर्षांत भारताने संयम, मुत्सद्देगिरी आणि ठाम भूमिका या तिन्हींचा मिलाफ साधत प्रत्येक वेळी पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. जगासमोर वस्तुस्थिती मांडली आणि “शांतता हवी, पण दहशतवाद चालणार नाही” हा स्पष्ट संदेश दिला. परिणामी, पाकिस्तानचा “भारताला उचकवून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवू” हा प्लॅन फसला.
हे ही वाचा:
अनिल अंबानी यांच्या निवासस्थान, कार्यालयावर सीबीआयचे छापे
‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाला स्थगिती! कारण काय?
इंस्टाग्रामवर मोदी जगात नंबर वन, १० कोटी फॉलोअर्स
गुहागर – शांततेत लपलेला कोकणाचा मोती
म्हणूनच आता इस्लामाबादने आपला मोर्चा अफगाणिस्तानकडे वळवला आहे. तिथे अस्थिरता आहे, राजकीय उलथापालथ आहे, आणि आर्थिक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत जर तणाव वाढला, तर जगाचे लक्ष वेधता येईल आणि “आम्हीही संकटात आहोत” म्हणून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीसाठी धाव घेता येईल, असा पाकिस्तानचा ‘मास्टरप्लॅन’ आहे. पण हा हिशोब तितका सोपा नाही. कारण इतर देशांचे सार्वभौमत्व पायाखाली तुडवून पाकिस्तान प्रत्येकवेळी स्वतःचे घोडे दामटवू शकत नाही. आणि आता अफगाणिस्तानातही आपण सतत कुणाच्या तरी राजकारणाचे प्यादे आहोत या भावनेविरुद्ध प्रचंड राग आहे. त्यात पाकिस्तान हा अफगाणिस्तानातील उलथापालथ याला १००% जबाबदार आहे अशी तालिबानची भूमिका आहे.
या सगळ्यात युद्ध किंवा तणाव हा अर्थव्यवस्था उभी करण्याचा मार्ग नाही; उलट तो शेवटचा खिळा ठरू शकतो हे पाकिस्तानला लक्षात येत नाहीये. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले राष्ट्र जर आणखी संघर्षात अडकले, तर परकीय गुंतवणूक तर दूरच, साधी मानवी मदतही राजकीय अटींवर येईल. आंतरराष्ट्रीय समुदाय आता इतका भोळा राहिलेला नाही की प्रत्येक वेळी “धोका आहे” या आरोळीवर लगेच पैशांची पेटी उघडेल. उलट, “तुम्हीच तणाव वाढवता आणि मग मदत मागता” असा प्रश्न आता पाकिस्तानला अधिक ठामपणे विचारला जाईल.
अफगाणिस्तानच्या बाबतीत तर समीकरण अजून गुंतागुंतीचे आहे. तिथल्या गटांमध्ये मतभेद असले, तरी बाहेरून हस्तक्षेप झाला की एकत्र येण्याची प्रवृत्ती तिथे आहे. अफगाण तालिबान याच संधीच्या शोधात होता पाकिस्तानने त्यांना आयते कोलीतच दिले आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी भूमिका घेतली, तर दक्षिण आशियात त्याच्याविरोधात “सामाईक शत्रू” ही भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे ही सगळी परिस्थितीच पाकिस्तानसाठी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी होईल.
थोडक्यात काय, तर आर्थिक चणचण झाकण्यासाठी युद्धाचा बागुलबुवा उभा करणे हा फारच धोकादायक खेळ आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, तर फक्त षटकार मारायचा विचार करून बिनतयारी फटका मारला, तर आउट होण्याची शक्यता जास्त असते. आणि सध्या पाकिस्तानने नेमके तेच केले आहे…
