पश्चिम बंगाल निवडणूक: अमित शाह यांचा भाजपचा संकल्प पत्र जाहीर

महिलांना ₹३,००० मासिक मदत, तरुणांसाठी भत्ता आणि रोजगाराच्या घोषणा

पश्चिम बंगाल निवडणूक: अमित शाह यांचा भाजपचा संकल्प पत्र जाहीर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकात्यात भाजपचा ‘संकल्प पत्र’ जाहीर केला. या जाहीरनाम्यात महिलांपासून तरुणांपर्यंत आणि रोजगारापासून कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न या संकल्प पत्रातून दिसून येतो.

या संकल्प पत्रातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे राज्यातील प्रत्येक महिलेला दरमहा ₹३,००० थेट त्यांच्या बँक खात्यात देण्याचे आश्वासन. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा आधार ठरेल, असे अमित शाह यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या योजनांच्या तुलनेत ही रक्कम अधिक असल्याने महिलांना मोठा आर्थिक लाभ मिळेल, असा दावा भारतीय जनता पक्ष (भाजप)ने केला आहे. महिलांसाठीच आणखी एक मोठा निर्णय म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन. यासोबतच महिला सुरक्षेसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये “महिला सुरक्षा बल” स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना एकरकमी ₹५०,००० आर्थिक मदत देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला, निफ्टी २४,००० पार

रुपयाचा जोरदार कमबॅक! ₹९२.४१ प्रति डॉलरपर्यंत मजबुती

अमेरिकन अर्थव्यवस्थेला जबर धक्का! GDP वाढ ०.५% वर

खरबूजच नाही तर खरबूजाच्या बियाही आहेत सुपरफूड! फायदे घ्या जाणून

तरुणांसाठीही या संकल्प पत्रात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बेरोजगार तरुणांना दरमहा ₹३,००० भत्ता देण्याचे आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना ₹१५,००० पर्यंत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹५ लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. कायद्याच्या दृष्टीनेही भाजपने ठोस भूमिका मांडली आहे. सत्तेत आल्यास सहा महिन्यांत समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच बेकायदेशीर घुसखोरीविरोधात “डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट” ही धोरण राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या संकल्प पत्रात रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. पश्चिम बंगालला “सोनार बंगला” बनवण्याचा संकल्प भाजपने मांडला आहे. अमित शाह यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर टीका करत बदलाची गरज असल्याचेही नमूद केले. एकूणच, भाजपचे हे संकल्प पत्र महिलांवर, तरुणांवर आणि सर्वांगीण विकासावर केंद्रित असून निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसून येतो. आता या घोषणांना जनतेचा किती प्रतिसाद मिळतो, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version