भूपेन बोरा यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच आपला निर्णय मागे घेतला. त्यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसच्या आसाम प्रदेशात खळबळ उडाली होती. सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ईमेलद्वारे राजीनामा पाठवला होता. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, राज्यातील पक्ष संघटनेत आपल्याकडे दुर्लक्ष होत असून नेतृत्वाकडून योग्य महत्त्व दिले जात नसल्याची खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली होती.
राजीनाम्याची बातमी समजताच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानी पोहोचले होते. यामध्ये आसाम काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष गौरव गोगोई, भंवर जितेंद्र सिंह, प्रद्युत बोर्डोलोई तसेच रायजोर दलाचे प्रमुख अखिल गोगोई यांचा समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या नेत्यांनी बोरा यांची समजूत काढत त्यांना पक्षातच राहण्याची विनंती केली. चर्चेनंतर काही तासांतच बोरा यांनी आपला राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बोरा यांना “आसाम काँग्रेसमधील शेवटचे हिंदू नेते” असे संबोधत मंगळवारी (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी त्यांच्या घरी भेट देणार असल्याचे सांगितले. त्यांनी दावा केला की राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली असून येत्या काळात आणखी काही आमदार पक्ष सोडू शकतात.
भूपेन बोरा यांनी २०२१ ते २०२५ या कालावधीत आसाम काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मागील वर्षी त्यांच्या जागी गौरव गोगोई यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. नेतृत्व बदलामुळे संघटनेत नवी ऊर्जा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; मात्र या निर्णयामुळे काही प्रमाणात अंतर्गत असंतोषही निर्माण झाल्याची चर्चा होती. सलग दोन विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर पक्षाची संघटना तळागाळात मजबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी बोरा यांची गणना केली जाते.
हे ही वाचा:
लालूप्रसाद, राबडीदेवींवर आरोप निश्चित
भूपेन बोराह यांचा आसाम काँग्रेसला टाटा, बाय बाय
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: हरियाणातून मुख्य शूटरसह चौघे गजाआड
ओडिशात कुख्यात शाहनवाझ गच्चीत बनवत होता बाँब, स्फोटात झाला मृत्यू, आईही दगावली
पत्रकारांशी बोलताना बोरा यांनी स्पष्ट केले की त्यांचा निर्णय कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा वैयक्तिक कारणांमुळे नव्हता. “मी ३२ वर्षे काँग्रेसची सेवा केली आहे आणि पक्षाच्या भविष्यासंदर्भात मला चिंता आहे. मी उच्च कमानला पाठवलेल्या राजीनाम्यात त्यामागील कारणांचा सविस्तर उल्लेख केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
