‘फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न पडतो!’

ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून फडणवीसांच्या वाढदिवशी स्तुतीसुमने

‘फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न पडतो!’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै हा वाढदिवस. त्यांच्या ५६व्या वाढदिवशी विविध स्तरातून त्यांचे अभिष्टचिंतन केले जात असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावरील महाराष्ट्र नायक या पुस्तकात त्यांच्या कार्यपद्धतीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात शरद पवार यांनी ही मुक्तकंठाने तारीफ केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट असल्याचे मत शरद पवार यांनी या पुस्तकातील लेखात नोंदवले आहे.

शरद पवार त्यात लिहितात की, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे ! अन् बोलायचंच म्हटलं तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसे काय नाकारता येईल ? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो’ तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे. देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाची, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला, त्यांनी केलेल्या कामांचा ऊहापोह कॉफी टेबलबुक मध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, अशी स्तुतीसुमने शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर उधळली आहेत.
शरद पवार म्हणतात, पूर्वीचे राजकारण आणि आजचे राजकारण फार बदललेले आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये वाद-प्रतिवाद होत, कलगीतुरे रंगत असत पण निवडणुका संपल्या की, सत्ताधाऱ्यांना संरचनात्मक आणि सकारात्मक कार्याकडे, समाजकारणाकडे वळता येई. आजकाल असे होत नाही. राजकारण ही सततची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डाव-प्रतिडाव, कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. मतभेदांनी टोक गाठले आहे. त्यामुळे नकारात्मक, प्रतिक्रियात्मक कार्यासाठी उर्जेचा व्यय होतो. त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो.

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा. जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा वाढदिवासानिमित्ताने व्यक्त करतो.

Exit mobile version