नंबर ३ साठी सुदर्शन योग्य पर्याय

नंबर ३ साठी सुदर्शन योग्य पर्याय

भारत सध्या तरुण खेळाडूंनी सजलेल्या नव्या युगात प्रवेश करत आहे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नवीन नेतृत्वगटासह इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे. माजी फिरकीपटू हरभजन सिंह यांनी संघाला आत्मविश्वास, संयम आणि निर्धाराने खेळण्याचा सल्ला दिला आहे.

विदर्भ क्रिकेट लीगच्या उद्घाटनप्रसंगी नागपुरात बोलताना हरभजन म्हणाले, “फक्त कौशल्य नाही, इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकदही तितकीच महत्त्वाची आहे. संघाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. हीच तरुण मंडळी – शुभमन गिल, ऋषभ पंत – यांनी गाबामध्ये इतिहास घडवला होता. आता पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याची संधी आहे.”

या दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, शुभमन गिल याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंत उपकर्णधार असेल. बुमराह कर्णधारीसाठी प्रमुख उमेदवार होता, मात्र कार्यभाराच्या कारणामुळे त्याचा विचार न करण्यात आल्याचे अजित अगरकर यांनी स्पष्ट केलं.

हरभजन पुढे म्हणाले, “ही टीम खूप तरुण आहे. यात रोहित, विराट, पुजारा, रहाणे यांच्यासारखे अनुभवसंपन्न खेळाडू नाहीत. पण मला खात्री आहे की हे तरुण खेळाडू या संधीचा पुरेपूर फायदा घेतील. त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे.”

नंबर ३ च्या जागेसाठी चर्चा सुरू असतानाच हरभजन यांनी बी. साई सुदर्शन याचे समर्थन केले. ते म्हणाले, “साई सुदर्शन डावखुरा फलंदाज आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आयपीएलमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि स्थिरता लक्षात घेता तो नंबर ३ साठी योग्य पर्याय आहे.”

श्रेयस अय्यरला वगळल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. यावर हरभजन म्हणाले, “श्रेयस अय्यर हा दर्जेदार खेळाडू आहे. वनडे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएलमध्ये त्याने सातत्याने खेळ केला आहे. मी असतो तर त्याच्या नावाचा नक्की विचार केला असता. मात्र हे शेवट नाही. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे.”

या दौऱ्याची सुरुवात २० जूनला हेडिंग्ले येथे होणार असून, ही मालिका 2025-27 WTC सायकलची देखील सुरुवात आहे. टीममध्ये केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश आहे.

विदर्भ क्रिकेट लीगच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना हरभजन म्हणाले, “ही लीग विदर्भातील स्थानिक प्रतिभांना मोठं व्यासपीठ देणार आहे. विदर्भची रणजी ट्रॉफी जिंकणारी मजबूत टीम आहे. अशा लीगमुळे नवोदित खेळाडूंना मोठ्या पातळीवर पोहोचण्याची संधी मिळते.”

Exit mobile version