टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामना अनिश्चिततेत सापडला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबाबत पाकिस्तान सरकारने संघाला स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी दिली असली, तरी भारताविरुद्ध सामना खेळू नये अशी अट घातल्याची माहिती समोर आली आहे. या भूमिकेमुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीकेची झोड उठली आहे.
भारत-पाकिस्तान सामना म्हणजे आयसीसी स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि महसूल मिळवून देणारा सामना मानला जातो. अशा वेळी स्पर्धेत सहभागी होताना विशिष्ट संघाला टाळण्याची भूमिका ही क्रीडाभावनेला धरून नसल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार सर्व सहभागी संघांनी नियोजित सामने खेळणे बंधनकारक असते. त्यामुळे पाकिस्तान अधिकृतरीत्या माघार घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई किंवा गुणकपात यांसारख्या परिणामांची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करत म्हटले, “पाकिस्तान क्रिकेटमध्ये निर्णय बदलले जाणे काही नवीन नाही. खेळाडू निवृत्ती जाहीर करतात आणि काही दिवसांतच माघार घेतात. तसाच हा निर्णयही बदलू शकतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या सातत्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनीही या निर्णयावर भाष्य करत, “अशा अटींमुळे आयसीसी स्पर्धेचे नुकसान होते. चर्चा होईल आणि शेवटी पाकिस्तानला सामना खेळावाच लागेल,” असे मत व्यक्त केले.
हेही वाचा :
…आणि योगी आदित्यनाथ यांनी छोट्या अनबी अलीचे ऍडमिशन केले!
पाकिस्तानातून आलेल्या दलित हिंदूंना निवारा द्या!
गणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी
१४६ प्रकाशवर्षे अंतरावर सापडला राहण्यायोग्य ग्रह!
याआधीही भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांवरून पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने झाली आहेत. आशिया चषक आणि विश्वचषकाच्या आयोजनावेळी ‘न्यूट्रल व्हेन्यू’ची मागणी, भारतात खेळण्याबाबत अनिश्चित भूमिका, तसेच स्पर्धांवर बहिष्काराच्या इशाऱ्यांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर अनेकदा टीका झाली आहे. काही माजी पाकिस्तानी खेळाडूंनीही पूर्वी “राजकारणापेक्षा क्रिकेट मोठे असावे” असे सांगत स्वतःच्या बोर्डालाच सुनावले होते.
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना प्रतिस्पर्ध्याची निवड करणे हा पर्याय नसतो. स्पर्धेची प्रतिष्ठा, प्रेक्षकांचा विश्वास आणि खेळाची भावना यांचा विचार करणे आवश्यक असते. भारताविरुद्ध न खेळण्याची अट कायम राहिल्यास पाकिस्तानची प्रतिमा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्हाखाली येऊ शकते.
आता पुढील काही दिवसांत पाकिस्तान आपली भूमिका कायम ठेवतो की निर्णयात बदल करतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
