टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचा विजय हा न्यूझीलंडने दिलेलं ‘गिफ्ट’ असल्याचा दावा करत त्याने कीवी संघाच्या रणनीतीवर टीका केली आहे.
पाकिस्तानमधील एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना आमिरने न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते सॅन्टनरच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारताला विश्वचषक जिंकणे सोपे झाले.
आमिर म्हणाला, “न्यूझीलंडने गोलंदाजीतील केलेले बदल मला समजले नाहीत. संघाला माहिती होते की अभिषेक शर्मा स्पिनविरुद्ध संघर्ष करतो, तरीही स्पिनचा पुरेसा वापर करण्यात आला नाही.”
त्याने असेही सांगितले की, २००५ पासून न्यूझीलंडचा खेळ पाहत आहे, मात्र पहिल्यांदाच संघ इतका दबावाखाली खेळताना दिसला.
आमिरने मान्य केले की भारताने या सामन्यात सिद्ध केले की मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीही तितकीच महत्त्वाची असते.
विशेष म्हणजे, आमिरने आधी भारत सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचणार नाही अशी भविष्यवाणी केली होती. मात्र भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि त्यानंतर न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवत किताब पटकावला. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून आमिरवर जोरदार टीका होत आहे.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २५५ धावा केल्या. संजू सॅमसनने ८९, अभिषेक शर्माने ५२, ईशान किशनने ५४, तर शिवम दुबेने २६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १५ धावा देत ४ विकेट्स, तर अक्षर पटेलने ३ षटकांत २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या स्पर्धेत संजू सॅमसन ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरला, तर अंतिम सामन्यातील शानदार गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
