भारतीय महिला अंडर-१७ फुटबॉल संघाचा एएफसी अंडर-१७ महिला एशियन कपमधील प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सोमवारी चीनविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचे फिफा अंडर-१७ महिला विश्वचषकात स्थान मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, या पराभवानंतरही मुख्य प्रशिक्षक पामेला कॉन्टी यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.
पामेला कॉन्टी म्हणाल्या, “चीन आमच्यापेक्षा अधिक मजबूत संघ होता. त्यांच्याकडे ताकद आणि अनुभव दोन्ही होते, त्यामुळे त्यांचा विजय योग्यच होता. पण मला सर्वाधिक निराशा झाली ती म्हणजे आम्ही पहिल्या हाफच्या अखेरीस आणि पुन्हा ९०व्या मिनिटाला गोल स्वीकारला. मी खेळाडूंना शेवटच्या मिनिटांत लक्ष केंद्रित ठेवण्यास सांगितले होते.”
पराभवानंतरही त्यांनी भारतीय खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “मला या खेळाडूंवर खूप अभिमान आहे. वैयक्तिकरित्या हा संपूर्ण स्पर्धेचा अनुभव माझ्यासाठी खूप सुंदर होता. आम्ही ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीनसारख्या आशियातील बलाढ्य संघांविरुद्ध खेळलो. या स्पर्धेतून आमच्या मुलींना मोठा अनुभव मिळाला.”
कॉन्टी यांनी सांगितले की या स्पर्धेमुळे भारतीय संघाला आशियाई फुटबॉलची खरी पातळी समजली आहे. “मी सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना सांगितले की आता त्यांना समजले आहे की आशियात कोणत्या दर्जाचा फुटबॉल खेळला जातो. यश मिळवण्यासाठी सतत कठोर मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितले की हा संघ अजून खूप युवा आहे आणि भविष्यात मोठी कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. “दरवर्षी त्यांना आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. ही टीम खूप तरुण आहे आणि त्यांच्याकडे अजून खूप काही देण्यासारखे आहे,” असे कॉन्टी यांनी नमूद केले.
दरम्यान, संघातील सेंटर बॅक खेळाडू अभिस्ता बसनेत हिनेही भावनिक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “या निकालानंतर बोलणे कठीण आहे. आम्ही वेगळ्या विचाराने मैदानात उतरलो होतो, पण फुटबॉलमध्ये असे कधी कधी घडते. मात्र, संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळलो आणि एकसंघ राहिलो, त्याचा मला अभिमान आहे.”
१५ वर्षीय अभिस्ताने सांगितले की २१ वर्षांनंतर भारताने एएफसी अंडर-१७ महिला एशियन कपमध्ये पुनरागमन करत क्वार्टर फायनल गाठणे ही मोठी उपलब्धी आहे. “आम्ही एक वर्षाहून अधिक काळ एकत्र मेहनत घेतली. आता आमचं नातं कुटुंबासारखं झालं आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीनसारख्या संघांविरुद्ध खेळून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले,” असे ती म्हणाली.
भारतीय संघाने गटातील अखेरच्या सामन्यात लेबनॉनला ४-० ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र, विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला शेवटचा टप्पा भारताला पार करता आला नाही.
