पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या आयपीएल २०२६ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापतीतून सावरलेल्या अय्यरने आता केवळ पुनरागमनच नाही, तर टीकाकारांना उत्तर देण्याचीही जिद्द दाखवली आहे.
जिओस्टारच्या ‘बिलीव्ह’ या कार्यक्रमात इरफान पठाणशी संवाद साधताना अय्यरने आपल्या प्रवासाबद्दल सविस्तर भाष्य केले. “माझ्याभोवती काही लोक म्हणायचे की, तू हे करू शकत नाहीस. हे अशक्य आहे. मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच त्यांना चुकीचं सिद्ध करण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली,” असे अय्यरने सांगितले.
पाठीच्या दुखापतीनंतर अनेकांनी त्याच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर अय्यर म्हणाला, “मी स्वतःलाच विचारलं — मी पुन्हा तसाच का बनू शकत नाही? दुखापतीनंतर तुमची मानसिकता कशी असते, हे खूप महत्त्वाचं असतं.”
आत्मविश्वासाबद्दल बोलताना तो म्हणाला, “अपयश, नकार आणि कठीण प्रसंगातूनच खऱ्या अर्थाने शिकायला मिळतं. स्वतःशी संवाद साधणं खूप गरजेचं असतं. लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही स्वतःला कसं सावरता, हे महत्त्वाचं आहे.”
एक उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून उदयास आलेल्या अय्यरने सांगितले की, “मी शेवटपर्यंत नाबाद राहून सामना संपवण्यावर विश्वास ठेवतो. जितका जास्त वेळ क्रीजवर राहीन, तितकी संघाची जिंकण्याची शक्यता वाढते.”
आपल्या शॉर्ट-बॉल कमकुवतपणावर मात करताना तो म्हणाला, “लोक म्हणायचे की मी शॉर्ट बॉल कधीच सुधारू शकणार नाही. पण त्याच गोष्टीने मला प्रेरणा दिली. आधी मी अशा चेंडूंवर फक्त बचाव करायचो, पण आता संधी मिळाली तर थेट षटकार मारण्याचा प्रयत्न करतो.”
अय्यरने आपल्या सराव पद्धतीतही बदल केला आहे. तो आता दीर्घकाळ फलंदाजीचा सराव करत असून जास्तीत जास्त गोलंदाजांचा सामना करण्यावर भर देतो. “मी ठराविक पॅटर्न फॉलो करत नाही. पिचवर वेळ घालवून स्वतःची लय शोधण्यावर माझा भर असतो,” असे तो म्हणाला.
या सर्व प्रयत्नांमुळेच श्रेयस अय्यर सध्या पंजाब किंग्ससाठी एक विश्वासार्ह कर्णधार आणि ‘मॅच फिनिशर’ म्हणून समोर आला आहे.
