संसदेचे पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या गदारोळामुळे अक्षरशः वाया गेले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हा खूप मोठा विजय वाटत आहे. अधिवेशन संपल्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी घोषणा केली की, पंतप्रधानांना नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना वेड करून टाकणारे. काँग्रेस नेते राहुल गांधी कायम ताळतंत्र सोडून बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात सभ्यतेचा लवलेश नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ते कायम एकेरी भाषेत उल्लेख करत असतात. गेल्या बारा वर्षांत भाजपाच्या समोर पराभवाचे शतक राहुल गांधी लवकरच साजरी करतील. जिंकता येत नाही म्हणून काय झाले, जिंकलेल्यांना शिव्या तर घालू शकतो; हे राहुल गांधी वारंवार त्यांच्या समर्थकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जगातील कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता जी कोणती खेळी करतो, ती काहीतरी साध्य करण्यासाठी करतो. राहुल गांधी यांचे मात्र तसे नाही. मोदींना शिव्या घालून जिंकता येते का, हे पाहणे हा एक प्रयोग असू शकतो; परंतु गेल्या बारा वर्षांत सतत मोदींना शिव्या घातल्यानंतरसुद्धा यश येत नाही हे पाहून खरंतर राहुल गांधी यांनी त्यांची रणनीती बदलली पाहिजे होती, परंतु शिव्या घालण्याचा त्यांचा आजार वाढतच चाललाय.
