पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात फक्त कार आणि बस या वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
१३.३ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पुढील महिन्यात करण्यासाठी एमएसआरडीसी सज्ज झाले आहे. याआधी एमएसआरडीसी, वाहतूक विभाग, महामार्ग पोलिस आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करत वाहतूक व्यवस्थापनाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.
एक्स्प्रेस वेवरील एकूण वाहतुकीत कार आणि बस यांचे प्रमाण सुमारे ७० टक्के असून, उर्वरित ३० टक्के हिस्सा अवजड वाहनांचा आहे. याच पार्श्वभूमीवर, सुरुवातीच्या सहा महिन्यांत फक्त हलक्या वाहनांनाच परवानगी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर मर्यादित स्वरूपात मालवाहतूक वाहनांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महामार्ग पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, बोरघाट परिसरात अवजड वाहनांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या लक्षात घेता, मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर या मार्गावरील ताण सुमारे ७० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कार आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान आणि कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
हेही वाचा :
उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले
ट्रम्प यांचा यू-टर्न; इराणसोबतचा शस्त्रसंधी करार वाढवला
“भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!”
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ८.९२ किलोमीटर लांबीचा बोगदा, जो आशियातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक मानला जातो. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना या मार्गावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे ठरवण्यात आले आहे. अशा वाहनांचा अपघात झाल्यास बचावकार्य कठीण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे.
एकूणच, ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर पुणे–मुंबई प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
