पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एक महत्त्वपूर्ण असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून हा उपक्रम आता देशासाठी नवा सामाजिक मॉडेल म्हणून आकाराला येत आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राच्या निमित्ताने ‘एकतारा गुरुकुल’तर्फे आयोजित ‘त्रिकर्म उत्सव’ दरम्यान १७२ गावांतील १००८ कुटुंबांनी ‘गृह गुरुकुल’ उभारण्याचा सामूहिक संकल्प घेतला.
उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेले ‘गृह गुरुकुल अभियान’ हे कुटुंबाला पुन्हा शिक्षण, संस्कार आणि कुलपरंपरेशी जोडणारे केंद्र बनवण्यावर आधारित आहे. “कुटुंब म्हणजेच पहिला गुरुकुल” या संकल्पनेतून १७२ गावे आणि १००८ कुटुंबांनी एकत्र येत जीवनमूल्यांचा पुनर्जागरणाचा संकल्प केला. या कार्यक्रमात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपस्थिती दर्शवत एकतारा गुरुकुलच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. परंपरा, चालीरीती आणि संस्कार हे भारताचे वैशिष्ट्य असून त्यांचे जतन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजक आकाश नारायण बिस्वास म्हणाले, “जोपर्यंत माता आणि पिता स्वतः गुरु बनत नाहीत, तोपर्यंत घर प्राथमिक गुरुकुल बनू शकत नाही. घर गुरुकुल नसेल तर नवी पिढी मुळांपासून दूर जाईल आणि त्यामुळे स्थलांतर, जमीन वाद व कुटुंब विघटन वाढेल. ‘गृह गुरुकुल’ हा यावर प्रभावी उपाय ठरू शकतो.” या संदर्भात कुडळी श्रींगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, भारतीय संस्कृती ही कुलपरंपरेवर आधारित असून कुलदेवता, कुलगुरु, कुलविद्या, कुलाचार आणि कुलवृत्ती या घटकांचे संरक्षण केल्यास सर्वांगीण विकास साध्य होतो. एकतारा गुरुकुलने उचललेले ‘गृह गुरुकुल’ पाऊल अत्यंत प्रशंसनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेले ‘आईचा पदर’ हे भव्य स्वागत द्वार १७२ गावांतील सुमारे ४५० मातांच्या साड्यांपासून उभारण्यात आले होते. हे दृश्य मातृशक्तीची एकता आणि सांस्कृतिक जागृतीचे प्रभावी प्रतीक ठरले. कार्यक्रमात गाव देवी सजावट स्पर्धेत कोने गावाला प्रथम (₹२५,०००) आणि भोपिबली गावाला द्वितीय (₹१५,०००) पारितोषिक मिळाले. तसेच सर्वात मोठ्या संयुक्त कुटुंब सन्मानात श्रीराम भास्कर अंबावणे परिवार प्रथम, जयवंत मोतीराम अंबावणे परिवार द्वितीय आणि पालकर बंधू परिवार तृतीय क्रमांकाने सन्मानित झाले. कुलवृक्ष स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर ३५ महिलांनी गुढीपाडवा फॅशन शोमध्ये पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले.
हे ही वाचा:
‘पुष्पा २’ ला मागे टाकत ‘धुरंधर २’ सुपरहिट! पाच दिवसांतच ८०० कोटींचा आकडा पार
“इराणवर हल्ला करण्याची कल्पना…” ट्रम्प यांनी कोणाकडे दाखवले बोट?
दोन भारतीय एलपीजी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी
वित्त विधेयकासह, कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत सादर
एकतारा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, तबला वादन, गायन, तारपा नृत्य आणि नाट्यप्रयोग अशा आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. गुरुमाता अरुणा देवी बिस्वास यांच्या संगीत सादरीकरणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. सहभागी कलाकारांनी “आम्ही केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजनिर्मितीसाठी सादरीकरण करतो” असा संदेश दिला. १७२ गावांचा सहभाग आणि १००८ कुटुंबांचा संकल्प यामुळे हा उपक्रम देशभर राबवता येण्यासारखा विस्तारक्षम मॉडेल म्हणून पुढे येत आहे. कुटुंबाला पुन्हा संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या या संकल्पनेतून अनेक सामाजिक समस्यांवर मूळातून उपाय मिळू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वाड्यातील त्रिकर्म उत्सव हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, एक सांस्कृतिक जागरण आणि राष्ट्रनिर्मितीकडे नेणारी चळवळ ठरत आहे. “राष्ट्रनिर्मितीची सुरुवात घरापासून होते” हा संदेश देत ‘गृह गुरुकुल अभियान’ देशाला नवी दिशा देण्याची क्षमता दर्शवत आहे.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, वाडा नगर पंचायत अध्यक्षा रीमा गंधे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय कार्यकर्ते संजय गोडसे, वाडा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद खोसला, गोवर्धन इको व्हिलेजचे प्रतिनिधी अभिमन्यु प्रभुजी, एकतारा गुरुकुलचे संचालक आकाश नारायण बिस्वास आणि कार्यक्रम व्यवस्था प्रमुख मिलिंद वाडेकर उपस्थित होते. यावेळी १७२ गावांतील सरपंच, पोलीस पाटील, माध्यम प्रतिनिधी आणि हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
