रविवारी हरिद्वारमधील मनसादेवी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला आणि २५ हून अधिक जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंदिराच्या पायऱ्यांवर गर्दी वाढल्याने ही दुर्घटना घडली.
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले, “हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात मोठी गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मी घटनास्थळी जात आहे. घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच मिळेल.”
ही घटना भाविकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे. त्यातून गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या.
जखमींना मदत आणि बचाव कार्य
अधिकाऱ्यांकडून मृतांची ओळख पटवण्याचे आणि घटनेचे खरे कारण जाणून घेण्याचे काम सुरू आहे. एका प्रत्यक्षदर्शीने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, “मंदिराजवळ एक विजेचा खांब होता, जिथे लोकांना विद्युत प्रवाह जाणवत असल्याचे वाटले. त्यानंतर लोक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली.”
तथापि, पोलिसांनी शॉक लागल्यामुळे घटना झाल्याचा दावा फेटाळला आहे.
हे ही वाचा:
जायकवाडीच्या धरणसाठ्यात वाढ, मराठवाड्याला अलर्ट
अमेरिकेत टळला मोठा विमान अपघात
खाद्यपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करणे आरोग्यास हानीकारक
मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीची बातमी अत्यंत दुःखद आहे. एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून बचाव व मदत कार्य करत आहेत.
“मी सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व भाविकांच्या कुशलतेसाठी माता राणीकडे प्रार्थना करतो,” असेही त्यांनी म्हटले.
