दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता प्रकाश राज हे धुरंधर २- द रिव्हेन्ज या चित्रपटामुळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या चित्रपटाबद्दल कौतुकोद्गार काढणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकारांवर त्यांनी टीका केली आहे. प्रकाश राज यांनी एक व्हिडिओ शेअर करत दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-थ्रिलर चित्रपटाला अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे दिसते. तसेच त्यांनी अल्लू अर्जुन, राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू यांनाही लक्ष्य केले आहे.
प्रकाश राज यांनी X (पूर्वी ट्विटर) वर अभी ना जाओ छोड कर हे देवानंद यांचे गाणे रेडिओवर वाजत असल्याचा व्हीडिओ शेअर केला आहे. हम दोनो या चित्रपटातील हे गाणे असून हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, मै धुरंधरसे बहुत दूर हूँ और आप? यातून त्यांनी चित्रपटापासून स्वतःला दूर ठेवत असल्याचा संकेत दिला.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी एका युजरच्या पोस्टला कोट-ट्वीट केले. त्या पोस्टमध्ये दक्षिण भारतीय कलाकारांनी चित्रपटाचे केलेले कौतुक नमूद केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी लिहिले, दक्षिणेतही दुसऱ्यासमोर झुकण्याची लागण लागली की काय? असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
दलित महिलेच्या लव्ह जिहाद प्रकरणात हलगर्जीपणा करणारे दोन पोलिस निलंबित
गॅस पुरवठ्याची चिंता; महिंद्रा, मारुती, टाटाच्या उत्पादनावर काय परिणाम?
भारताचा एलपीजी पुरवठा धोरणात मोठा बदल
यूट्युबर ध्रुव राठी यानेही या चित्रपटावर टीका करत तो प्रचारकी असल्याचे म्हटले होेते. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया देताना ध्रुव राठीने चित्रपटाला विरोध केलाय मग तो पाहिलाच पाहिजे, असे म्हटले आहे.
दुसरीकडे, दक्षिणेतील मोठ्या कलाकारांनी चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे. राम चरणने आपल्या प्रतिक्रियेत चित्रपटाला प्रभावी असे म्हटले होते तर त्याने रणवीर सिंगच्या अभिनयाचे कौतुकही केले. तो लक्षवेधक कलाकार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आर माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांच्या अभिनयालाही त्याने दाद दिली आहे.
धुरंधर २ द रिव्हेन्ज हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट २०२५ मधील ‘धुरंधर’चा सिक्वेल आहे आणि त्यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.
