…तेव्हा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी घेतला होता खरपूस समाचार!

…तेव्हा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी घेतला होता खरपूस समाचार!
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक विवेक रंजन अग्निहोत्री – काश्मीर फाईल्स चे निर्माते – यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आत्ता त्यांचा विषय निघण्याचे कारण असे, की त्यांना काही काळापूर्वी ऑक्सफर्ड युनियन सोसायटी या ख्यातनाम जागतिक दर्जाच्या संस्थेकडून एका वादविवाद आयोजनामध्ये भाग घेण्यासाठी सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले होते. वादाचा विषय होता – “या सभागृहाच्या मते काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे.” (!)
विवेक रंजन अग्निहोत्री यांनी संस्थेचे अध्यक्ष इब्राहीम ओस्मान मोवाफी यांना पत्र लिहून ते आमंत्रण सन्मानपूर्वक पण स्पष्टपणे नाकारले. विषय केवळ इतकाच नसून, वस्तुस्थिती ही आहे, की अग्निहोत्री यांचे ते पत्र अत्यंत उत्कृष्ट लेखनाचा नमुना असून, प्रत्येकाने पुनःपुन्हा वाचावे, असे आहे. पुढील मजकूर विवेक अग्निहोत्री यांच्या पत्राचा अनुवाद आहे.
दि. २ सप्टेंबर २०२४ 
इब्राहीम ओस्मान मोवाफी, 
अध्यक्ष , ऑक्सफर्ड युनियन सोसायटी
प्रिय ओस्मान मोवाफी, 
ऑक्सफर्ड युनियन सोसायटीमध्ये एका वादविवाद समारंभात उपस्थित राहण्यासाठी मला दिलेले आमंत्रण मिळाले. त्यासाठी धन्यवाद. ऑक्सफर्ड वादसभेमध्ये भाषण देण्याची संधी मिळणे हे कोणाही विद्वानाला  लाडके स्वप्न वाटते, असे असूनही मी मात्र आपले आमंत्रण , त्यातील विसंगती,  बघून विचारात पडलो. आणि अखेरीस  पूर्ण विचारांती ते निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय मी घेत आहे. 
ज्या वादासाठी हे निमंत्रण आहे, त्याचा विषय असा आहे – “ह्या सभागृहाचा स्वतंत्र काश्मीर राष्ट्रावर विश्वास आहे”. हा विषय म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला सरळसरळ आव्हान असून, अर्थातच ते मला मान्य नाही.
माझ्या असे लक्षात येते, की हा केवळ १४० कोटी भारतीय जनतेचा अवमान आहे, इतकेच नव्हे, तर तो काश्मिरातील मूळ स्थानिक रहिवासी हिंदूंचा  – ज्यांना १९९० मध्ये नरसंहारात जीवाच्या भयाने विस्थापित केले गेले, त्यांचा अत्यंत घृणास्पद अवमान आहे. त्यांच्या जखमांवर मीठ चोळणे आहे. या वास्तवाला   ‘वादविवादाचा विषय’  बनवणे, म्हणजे जणू काही एका भयानक शोकांतिकेला जुगारावर लावण्यासारखे आहे, जिथे पैजेवर लावलेल्या गोष्टी   म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, त्या  आहेत – मानवी आयुष्ये, आणि मानवी रक्त !
काश्मीरमध्ये जे घडलेय, तो  निव्वळ वादाचा  विषय नसून, ती दुःख, वेदनांनी भरलेली कहाणी आहे, स्वतःचे अस्तित्व टिकवून धरण्याची धडपड आणि शांततेचा शोध, यांची गाथा  आहे. त्याला केवळ काश्मिरी स्वातंत्र्याच्या (तथाकथित) मुद्द्यावर – ‘हो’ किंवा ‘नाही’, असे स्वरूप देणे, म्हणजे त्यात गुंतलेल्या मानवी भावभावना आणि ऐतिहासिक वास्तवाकडे साफ दुर्लक्ष करण्यासारखे आहे. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार ही अशी वस्तुस्थिती आहे, जिची किंमत रक्त सांडून चुकवली गेली आहे, विद्वानांच्या वाक्चातुर्याने किंवा श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी नव्हे. 
मी तीन मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो; – 
१. १९९० मध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहारात तिथले मूळ रहिवासी असलेले पाच लाखांहून अधिक काश्मिरी हिंदू बळी पडलेत. मूळ स्थानिक रहिवासी असलेल्या  जवळ जवळ सर्व काश्मिरी हिंदुंना (जीवाच्या भयाने) काश्मीर सोडण्यास भाग पाडले गेले, आणि तेव्हापासून ते  निर्वासितांचे जिणे जगत आहेत. हे त्यांच्या इतिहासातील सातवे  जबरदस्तीचे स्थलांतर होय. या आधीच्या सहा वेळा कराव्या लागलेल्या स्थलांतरात किती अमानुष अत्याचार झाले असतील, त्याचा उल्लेख मी करतच नाही. हा वादाचा विषय नसून, ही ऐतिहासिक शोकांतिका आहे. 
हे ही वाचा:
इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप?
ईराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट सुरूच
पहलगामचा आरोपी कसुरीने उघड केले पाक-लष्कर ए तैयबाचे संबंध
उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
२. २०१९ मध्ये संविधानातील अनुच्छेद ३७० हटवण्यात आला, रद्दबातल केला गेला. त्यामुळे काश्मीरच्या तथाकथित स्वातंत्र्याचा प्रश्न पूर्णतः निकालात निघाला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता, आणि भविष्यात राहील. आणि ही अविभाज्यता सांस्कृतिक, सामाजिक  तसेच राजकीय तिन्ही स्वरुपाची आहे. 
३. जोपर्यंत लक्षावधी काश्मिरी हिंदू त्यांच्या मूळ वसतीस्थाना पासून दूर , निर्वासितांचे जिणे जगत आहेत, आणि इस्लामी दहशतवाद्यांच्या भयामुळे ते आपल्या मूळ गावी परत जाऊ शकत नाहीत, तोपर्यंत काश्मीरच्या (तथाकथित) स्वातंत्र्याची चर्चा होऊ शकत नाही. 
शेवटी मी इतकेच म्हणेन की मी केवळ निमंत्रण नाकारीत आहे, असे नसून, मी खरेतर ऑक्सफर्ड युनियन संस्थेला आवाहन करीत आहे, की त्यांनी एकविसाव्या शतकात खऱ्या अर्थाने प्रवेश करावा, ज्यामध्ये  वादविवाद / चर्चा या प्रगती संबंधी होणे अपेक्षित आहे,  केवळ बौद्धिक मनोरंजनासाठी जुन्या जखमा नव्याने उकरून काढणे हा वादविषय होऊ नये. 
माझ्या हृदयात भारत भरलेला आहे, आणि मन हे नेहमीच अर्थपूर्ण संवादासाठी उत्सुक आहे. 
 
विवेक अग्निहोत्री, 
(चित्रपट निर्माता व लेखक) 
Exit mobile version