गोवा विशेष: समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षिततेस नवी दिशा

सरकारचा ‘सागर सफर’ उपक्रम

गोवा विशेष: समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षिततेस नवी दिशा

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोवा राज्यात समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने ‘सागर सफर’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश समुद्रातील धोके समजावून सांगणे, योग्य प्रकारे पोहण्याचे मार्गदर्शन करणे आणि पर्यटकांना अधिक सुरक्षित अनुभव देणे हा आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. समुद्रातील बदलते प्रवाह, खोल पाणी, रिप करंट्स (धोकादायक ओढ) आणि इशारा ध्वजांचे महत्त्व याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्यामुळे दरवर्षी काही अपघात घडतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारने लोकजागृतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
राजकोटमध्ये १,३०० हून अधिक अनधिकृत घरांवर बुलडोझर

गेम प्लान तर चांगला होता, दैव आडवे आले!

हद्दपार करूनही परत येतायत बांगलादेशी

घाटकोपरमध्ये रेल्वे पोलिस भर्तीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी अंत

‘सागर सफर’ या उपक्रमात प्रशिक्षित लाइफगार्ड्स आणि तज्ज्ञ सहभागी होतात. राज्यातील अधिकृत जीवनरक्षक संस्था Drishti Marine यांच्या सहकार्याने हे सत्र घेतले जात आहेत. या सत्रांमध्ये पर्यटकांना समुद्रात उतरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, इशारा ध्वजांचा अर्थ काय असतो, लाटांची दिशा कशी ओळखावी आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली जाते.

हा कार्यक्रम गोव्याच्या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर आयोजित केला जात आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत सत्रे घेतली जातात, जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटक सहभागी होऊ शकतील. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. पर्यटकांना केवळ माहितीच दिली जात नाही, तर प्रत्यक्ष समुद्रात सुरक्षितपणे कसे वागावे याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते.

या उपक्रमाला पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या सत्रांमुळे समुद्राबद्दलची भीती कमी झाली आणि सुरक्षिततेविषयीची जाणीव वाढली, असे सांगितले आहे. सरकारच्या मते, समुद्रकिनाऱ्यांवरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जागरूकता हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

गोवा हे देश-विदेशातील लाखो पर्यटकांचे आकर्षण आहे. पर्यटन हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ‘सागर सफर’ हा उपक्रम त्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे.

Exit mobile version