कोकणनगर – जय जवान गोविंदांचा डंका जगभर!

दहा थरांचा विश्वविक्रम

कोकणनगर – जय जवान गोविंदांचा डंका जगभर!

आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला आणि एकतेला एक सुवर्ण मुकुट लाभला आहे. कारण, दहीहंडी म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर ती महाराष्ट्राच्या धैर्याची, शौर्याची आणि एकोप्याची जिवंत प्रतिमा आहे. या परंपरेला आज मुंबईतील कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने दहा थरांचा विश्वविक्रम करून इतिहास रचला आहे.

१६ ऑगस्टचा दिवस. सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. पण गोविंदांचा उत्साह मात्र ढगांपलीकडे गेला होता. हजारो प्रेक्षक ठाण्यात जमले होते. डोळ्यांत कुतूहल, हृदयात उत्सुकता आणि तोंडात जयघोष घेऊन लोकांनी दहीहंडीचा सोहळा अनुभवायला सुरुवात केली.

ढोल-ताशांच्या गजरात जेव्हा कोकणनगर गोविंदांनी एकामागोमाग एक थर रचत नेले. तेव्हा संपूर्ण मैदान श्वास रोखून पाहत होतं. सात, आठ, नऊ… आणि मग तो क्षण आला, जेव्हा दहाव्या थरावर लहानसा गोविंदा उभा राहिला. आकाश फाडून दणाणून आवाज घुमला –
“गोविंदा आला रे आला!”

संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत नोंदला विक्रम

हा पराक्रम ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात घडला. उपस्थित मंत्री प्रताप सरनाईक आणि हजारो प्रेक्षकांनी या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होते, थरांच्या गगनचुंबी रचनेला सलामी दिली. २५ लाख रुपयांचं भव्य पारितोषिक कोकणनगर पथकाला देऊन या क्षणाची सुवर्ण नोंद झाली. गर्दीत आनंदाश्रू तरळले, जयघोष आकाशाला भिडले, आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला

जय जवानचीही दणक्यात एन्ट्री

त्याच वेळी घाटकोपरमध्ये जय जवान पथकानंही १० थर रचून दाखवले. आभाळ फाडून टाळ्यांचा आणि जयजयकाराचा गजर झाला. “हे बघा! जोगेश्वरीचे दोन्ही वीर – महाराष्ट्राचा इतिहास बदलणारे!” असं लोक म्हणू लागले

विक्रम मोडून किमया साधली

याआधी नऊ थरांचा विक्रम होता. पण यंदा दोन्ही पथकांनी ती मर्यादा फोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. कोकणनगरला २५ लाखांचं पारितोषिक मिळालं, तर जय जवानलाही भव्य गौरवाचा मान मिळाला.

विक्रम मोडून इतिहास रचला

याआधी ९ थर हा मर्यादेचा टप्पा मानला जात होता. जय जवान आणि इतर पथकांनी नऊ थरांची किमया साधली होती. पण कोकणनगर पथकाने तो विक्रम मोडून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रो गोविंदा स्पर्धेत कोकणनगर पथकाने १० थरांचा प्रयत्न केला होता, पण अखेरच्या क्षणी थर कोसळले. त्या वेळी पारितोषिक गमावलं, पण हार मानली नाही. मनाशी पक्कं ठरवलं की “यंदाच्या दहीहंडीत इतिहास घडवायचाच!” आणि आज त्यांनी तो संकल्प पूर्ण केला.

महाराष्ट्राचा अभिमान

हा विक्रम फक्त एका पथकाचा नाही. हा पराक्रम मुंबई-ठाण्यातील, कोकणातील, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा आहे. कारण दहीहंडी हा फक्त थरांचा खेळ नाही – ती आपल्या धैर्याची, विश्वासाची, मैत्रीची आणि अभिमानाची ओळख आहे. आज कोकणनगर गोविंदा आणि जय जवान गोविंदा पथकांनी केवळ दहीहंडी फोडली नाही, तर महाराष्ट्राचा झेंडा जगाच्या पातळीवर उंचावला आहे.

हा सुवर्ण क्षण आपण सर्वांनी जतन करून ठेवावा, कारण पुढच्या पिढ्यांना सांगताना आपण अभिमानाने म्हणू शकतो –
“हो, आम्ही पाहिलंय तो क्षण, जेव्हा कोकणनगर गोविंदांनी दहा थर लावून इतिहास घडवला होता!”

Exit mobile version