टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामनाफिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेला आणि शिक्षा भोगलेला आमीर आता भारतीय संघावर टीका करताना दिसत आहे.
एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना आमीरने दावा केला की, टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही. “मी असं म्हणत नाही की भारत वाईट संघ आहे, पण त्यांच्या फलंदाजीवरून मला ते सेमीफायनलमध्ये जातील असं वाटत नाही. माझ्या मते दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या अधिक मजबूत संघ आहेत,” असे तो म्हणाला.
आपल्या मतावर ठाम राहत आमीरने पुढे म्हटले, “तुम्हाला माझं मत आवडलं किंवा नाही, तो तुमचा प्रश्न आहे. मला जबरदस्तीने भारत फायनल खेळेल असं म्हणायचं नाही. मला वाटतं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये जातील.”
मात्र त्याने इतकंही जोडून सांगितलं की, “भारतीय संघाने मला चुकीचं ठरवलं तर मला आनंदच होईल.”
दरम्यान, ग्रुप स्टेजमध्ये भारताने सर्व चार सामने जिंकत अव्वल स्थान पटकावत सुपर-८मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-८मध्ये भारत ग्रुप १ मध्ये असून त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. भारत २२ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आणि १ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२४चा विजेता असलेल्या भारतासमोर यंदा घरच्या मैदानावर किताब राखण्याचे मोठे आव्हान आहे. अशा वेळी फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेल्या खेळाडूकडून होत असलेल्या टीकेकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
