पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जेव्हा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपली तेव्हा अनेकांच्या भुवया वक्र झाल्या होत्या. यांना झेपेल काय, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच निर्मला सितारमण यांनी सगल ९ व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशाच्या राजकीय इतिहासात हा विक्रम आहे. जेएनयूची विद्यार्थिनी ते देशाच्या अर्थमंत्री असा त्यांचा प्रवास दैदीप्यमान आहे.
एक उद्योजक म्हणून देशाच्या अर्थसंकल्पावर माझी बारीक नजर असते. गेली अनेक वर्षे मी नियमितपणे अर्थसंकल्प ऐकत आलेलो आहे. निर्मला सितारमण यांनी भारतीय पद्धतीने लाल चोपड्यातून अर्थसंकल्प आणण्याची सुरूवात केली. ब्रीफकेस संस्कृतीला त्यांनी फाटा दिला. अर्थसंकल्प मांडताना त्या कोणती साडी नेसतात, याचीही बरीच चर्चा होते. त्यांच्या कर्तृत्वाची मात्र म्हणावी तशी चर्चा झालेली नाही.
सुरूवातीच्या काळात त्यांना आर्थिक विषयातील फार काही कळत नाही, असा सूर बऱ्याच लोकांनी लावला. भाजपाच्या एका दिग्गज नेत्याचाही याच समावेश होता. खरे तर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांची भूमिका लाजबाब होती. साधेपणाच्या आड दडलेल्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा वापर करून समोरच्याला निरुत्तर करण्याची क्षमता त्यांनी वारंवार दाखवलेली आहे. अर्थमंत्री म्हणून काम करताना संसदेत या क्षमतेचा परीचय त्यांनी भल्याभल्यांना दिलेला आहे.
हे ही वाचा:
अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य
“ममता बॅनर्जींच्या आदेशावरून हिंदूविरोधी टिप्पणी केली”
अर्थसंकल्पाच्याच वेळी सेन्सेक्स १५०० अंकानी कोसळला
जोखमीच्या ऑप्शन्स ट्रेडिंगला अर्थसंकल्पातून दणका
जेएनयू (JNU) मधून अर्थशास्त्रात एम.फिल. पूर्ण केलेली ही महिला जेव्हा संसदेत आकडेवारी मांडते, तेव्हा त्यांच्या अभ्यासाचा आवाका स्पष्ट जाणवतो. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय असोत किंवा अर्थमंत्री म्हणून जागतिक मंदीच्या काळात भारताची नौका स्थिर ठेवण्याचे आव्हान असो; त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर जमिनीवरची आर्थिक परिस्थितीची त्यांना अचूक जाण आहे.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर एक नजर टाकली तर त्यात सातत्य दिसते. आधी ज्या दिशेने पावले टाकली त्या दिशेने अधिक दमदारपणे वाटचाल करण्याचा आत्मविश्वास दिसतो. आजूबाजूला घडणाऱ्या भूराजकीय घडामोडींचे भान दिसते.
एआय, सेमी कण्डक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेअर अर्थ मिनरल्स याबाबत आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा पाहील्या की लक्षात येते अर्थसंकल्पावर असलेली जागतिक घडामोडींची आणि भारत-युरोपियन युनियन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार कराराची छाप. संसदेत बेजबाबदार विरोधी पक्ष असताना आपला मुद्दा संयमितपणे परंतु ठणकावून मांडणाऱ्या निर्मला सितारमण या खऱ्या अर्थाने भारतातील महिलांच्या प्रतिनिधी आहेत.
आजच्या झगमगाटाच्या जगात निर्मलाजींचा साधेपणा मनाला भावतो. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ‘सूटकेस’ची परंपरा मोडीत काढून भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले ‘बही-खाते’ आणले, हे त्यांच्या स्वदेशी विचारांचे निदर्शक आहे. त्यांच्या साड्यांची निवड असो किंवा बोलण्यातील स्पष्टवक्तेपणा, त्यात कुठेही बडेजाव नसतो. जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये आज त्यांचा समावेश होत असला तरी तरीही त्यांच्या वागणूकीत कधीही भपका-बडेजाव दिसत नाही. मध्यमवर्गीय ‘मूल्ये’ आजही टिकून आहेत. त्यांच्याकडे पाहीले तर आजही बाई कापडी पिशवी घेऊन बाजारात भाजी घ्यायला जात असतील, भाजीवाल्यासोबत भावावरून घासाघीस करीत असतील असे वाटते.
तामिळनाडूतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निर्मलाजींचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण. त्यांचे पती डॉ. परकला प्रभाकर त्यांच्या आर्थिक धोरणावर सतत टीका करत असतात. पतीची राजकीय विचारधारा वेगळी असूनही त्यांनी कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात जो समतोल राखला आहे, तो कौतुकास्पद आणि आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. उद्योजक म्हणून मला त्यांचे ‘डिसीजन मेकिंग’ भावते, तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा सर्वसामान्यांप्रती असलेला ओढा दिसतो. अरुण जेटली यांच्या आजारपणामुळे अर्थमंत्रालय निर्मलाजींकडे आले ते आजतागातयत. आपण रबरस्टॅंप नाही हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. नेमके आणि मुद्देसूद बोलणाऱ्या, आवश्यक तेव्हा आक्रमक होणाऱ्या निर्मलाजी सर्वसामान्यांना जवळच्या वाटतात.
भारताचा विकास दर, जीएसटी कराचे वाढलेले संकलन, देशाने अर्थकारणाच्या क्रमवारीत पटकावलेला चौथा क्रमांक हे सगळे त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात घडलेले चमत्कार आहेत.. कधी काळी फ्रॅजिल इकोनॉमी असा लौकीक असलेला भारत आज चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. पाच ट्रिलियन अर्थकारणाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. याचे श्रेय त्यांना दिले गेले नाही, ते घेण्यासाठी त्यांनी कधीच धडपड केली नाही. हेच त्यांचे मोठेपण आहे.
