वेग, कल्पकतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅंड गडकरी…

वेग, कल्पकतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅंड गडकरी…

महाराष्ट्राला नितीन गडकरी या नावाचा परिचय खूप जुना आहे. पायाभूत सुविधांचा कायापालट किती वेगवान होऊ शकतो, याची झलक दाखवण्याची सुरूवात त्यांनी महाराष्ट्रापासूनच केली. मला त्यांच्या महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD) पदाचा काळ प्रकर्षाने आठवतो. खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासाच्या मॉडेलची सुरूवात याच काळात झाली. महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांनी जे काम केलं, त्याने राज्याच्या पायाभूत सुविधांचा चेहराच बदलून टाकला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा पहिलाच प्रकल्प कमी वेळात आणि अत्यल्प खर्चात पूर्ण करून त्यांनी जगाला आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली. मुंबईची वाहतूक कोंडी फोडणे हे शक्य कोटीतील काम आहे, हे सिद्ध करण्याचे कर्तृत्वही त्यांचेच. ५५ उड्डाणपुलांचे जाळे त्यांनी मुंबईत उभे केले. गडकरी हे पूलकरी बनले. गावखेड्यापर्यंत रस्ते नेले.

सरकारी तिजोरीवर अवलंबून न राहता खुल्या बाजारातून भांडवल उभे करून विकास कसा साधायचा, हे त्यांनी ‘महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा’च्या माध्यमातून दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची ही क्षमता ओळखली त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन देशातील रस्ते, पूल, टनलचा कायापालट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

२०१४ मध्ये जेव्हा केंद्रात जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी महाराष्ट्राचा हा ‘सक्सेस फॉर्म्युला’ संपूर्ण देशभर राबवला. भारतात एकेकाळी दिवसाला जेमतेम १२ किमी रस्ते बनायचे, आज तो वेग ३० ते ३७ किमी प्रति दिवसापर्यंत पोहोचला आहे. हे केवळ नितीनजींच्या नियोजन आणि शिस्तीमुळे शक्य झाले.

सुरूवातीच्या काळात त्यांच्याकडे जलमार्ग आणि शिपिंग हे विभाग होते तेव्हा देशातील बंदरांचा विकास आणि या बंदरांना रस्त्यांनी जोडण्यासाठी ‘सागरमाला’ आणि देशात हायवे, एक्सप्रेस वे लॉजिस्टीक कोरीडोअरची निर्मिती करणारी ‘भारतमाला’ यांसारख्या महाकाय योजना त्यांनी राबवायला सुरूवात केली. नद्यांमध्ये जलमार्ग निर्माण करण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच.

१२ तासांत दिल्ली ते मुंबई हे अंतर पार करणारा आशियातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे त्यांचे ‘सिग्नेचर प्रोजेक्ट’ ठरतो आहे.  केवळ रस्ते बनवून ते थांबले नाहीत, तर भारताचे इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी त्यांनी फ्लेक्स इंजिन (इथेनॉल), इलेक्ट्रिक वाहने आणि ग्रीन हायड्रोजन यावर क्रांती सुरू केली आहे. इथेनॉलच्या वापरामुळे भारतात फक्त तेल आयातीवर होणारा खर्च कमी झालेला नाही. शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला आहे. त्यांच्याकडे दुहेरी उपयोगाच्या अलौकीक कल्पनांची कमी नाही. रस्त्यांच्या भरावासाठी नद्यांचा गाळ वापरण्याची सुरूवात त्यांनी केली. म्हणजे नदीचा गाळही निघाला, भरावासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही.

अशी अनेक उदाहरणे आहेत. प्लास्टीक कचरा आणि फ्लाय एशचा वापर रस्ते बांधणीत केला. याला म्हणतात टाकाऊ तून टिकाऊ. हायवेच्या बाजूला वृक्षांची हिरवळ निर्माण कऱण्याच्या कामात खाजगी कंपन्यांना सहभागी केले. त्यांचा सीएसआर तिथे वापरण्याची सूचना केली. जेणेकरून स्थानिक लोकांना रोजगारही मिळाला, रस्तेही हिरवेगार झाले. रोड बॅरीअर म्हणून अनेक ठिकाणी प्लॅस्टीक ऐवजी बांबूचा वापर करायला सुरूवात केली.

अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत झोजिला बोगद्याचे काम असो किंवा मुंबईतील समुद्रावरचा ‘अटल सेतू’, नितीनजींनी ‘अशक्य’ शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकला आहे.

नितीनजी नेहमी म्हणतात, “रस्ते नसतील तर विकास होऊ शकत नाही.” अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांचे एक वाक्य ते वारंवार सांगतात— “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले नाहीत, तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे.” हाच विचार घेऊन त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताला महामार्गांच्या सूत्रात गुंफले आहे.

त्यांच्यासोबतच्या अनेक भेटीत मला जाणवले की, त्यांच्या डोक्यात सतत कामाचा विचार सुरू असतो. अनेक योजना त्यांच्या मेंदूमध्ये पिंगा घालत असतात. ते खाण्याचे शौकीन आहेत आणि त्यांना कामाचे व्यसन आहे. एका मंत्र्याकडे असावी लागणारी कल्पकता, प्रशासकीय धाडस त्यांच्याकडे आहे. समस्या सोडवण्यासाठी ती समजून घेण्याची क्षमता असावी लागते. नितीन गडकरींकडे ही समज भरपूर प्रमाणात आहे.

एक उद्योजक म्हणून, देशाचा नागरीक म्हणून माझ्यासारख्या लोकांची काय अपेक्षा असते? देशात छान रस्ते, पूल, टनलचे जाळे असावे, वाहतुकीची कोंडी नसावी. हे काम गडकरींनी केले. अनेक ठिकाणी विकसित देशांच्या तोडीच्या दळणवळणाच्या रचना निर्माण केल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे यात कुठेही ठोकळेबाजपणा नाही, लालफितीचा कारभार नाही. हीच गडकरींची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा मान सन्मान वाढला, त्याचे एक मोठे कारण देशात विक्रमी काळात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा आहेत. त्याचे श्रेय नि:संशय गडकरींचे आहे

Exit mobile version