इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!

शिखर धवनची आशा

इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगत आहे. भारताच्या माजी सलामीवीर शिखर धवनने विश्वास व्यक्त केला आहे की सध्या मालिकेत पिछाडीवर असली तरी टीम इंडिया अजूनही परिस्थिती पलटवू शकते.

या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच विकेट्सनी जिंकला होता, तर दुसऱ्या कसोटीत भारताने जबरदस्त पुनरागमन करत ३३६ धावांनी विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यात भारताला केवळ २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामुळे इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकूनच भारताला मालिका खिशात घालावी लागणार आहे.

शिखर धवन म्हणतो, “भारतीय संघाने इंग्लंडच्या दौऱ्यावर जबरदस्त जिद्द दाखवली आहे. हे एक युवा आणि जिगरबाज टीम आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं सोपं नव्हतं. मला विश्वास आहे की भारतीय संघ उत्तम खेळ करतोय. इंग्लंड २-१ ने पुढे आहे, पण तरीसुद्धा भारत पासा पलटू शकतो.”

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने ४ गडी गमावत २६४ धावा केल्या आहेत. यशस्वी जायसवाल (५८) आणि केएल राहुल (४६) यांनी जबरदस्त सुरुवात करत ९४ धावांची ओपनिंग भागीदारी रचली. कर्णधार शुभमन गिल फक्त १२ धावांवर माघारी परतला.

यानंतर साई सुदर्शनने १५१ चेंडूत ७ चौकारांसह ६१ धावांची संयमी खेळी साकारली. ऋषभ पंत ३७ धावांवर खेळत असतानाच रिटायर्ड हर्ट झाला. दिवसअखेर रविंद्र जडेजा (१९*) आणि शार्दुल ठाकूर (१९*) नाबाद आहेत.

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने दोन बळी घेतले असून, क्रिस वोक्स आणि लियान डॉसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

Exit mobile version