“मुस्लिम बहुसंख्य देशांमध्येही रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी नसते आणि प्रार्थनेसाठी निश्चित जागा असतात, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
ते म्हणाले, “सरकार जर रस्त्यावर नमाज अदा करण्यावर निर्बंध घालत असेल, तर त्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, धार्मिक निर्बंध म्हणून नव्हे.” मंदिरांबाबत ते पुढे म्हणाले, “धार्मिक स्थळांवरील व्यवस्था त्या धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी केली जाते. लोकशाहीत जर लोकांना या व्यवस्था योग्य वाटत नसतील, तर ते आपले मत मांडू शकतात. त्यासाठी आपल्याकडे माध्यमे आहेत.”
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत त्यांनी सांगितले की, हा काळ विरोधी पक्षांनी सरकारला साथ देण्याचा आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचा आहे. “युद्ध सत्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी लढले पाहिजे, वैयक्तिक किंवा स्वार्थी हेतूंसाठी नव्हे. मला वाटते भारत योग्य मार्गावर आहे,” असे ते म्हणाले.
लोकसंख्येतील बदल आणि असमतोलाबाबतच्या चिंतेवर बोलताना त्यांनी इतिहासाशी त्याचा संबंध जोडला. “काही लोकांना वाटते की त्यांची उपासनेची पद्धत बदलली तरी त्यांचे पूर्वज आणि इतिहास एकच आहे. पण काहींना वाटले की परंपरा बदलल्यामुळे देश त्यांचा राहिला नाही. यामुळेच भारताची फाळणी घडली — असेच काहीसे इतर ठिकाणी, जसे लेबेनॉनमध्येही दिसते,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरात समान पूर्वज आणि राष्ट्रीय एकतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे, ज्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भर दिला आहे. “ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. दरम्यान, जे लोक हे समजत नाहीत त्यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेला हानी पोहोचवू नये,” असे त्यांनी सांगितले.
आंबेकर यांनी सीएए, एनआरसी आणि सामाजिक आर्थिक, जातीय जनगणना यांसारख्या उपाययोजनांचे समर्थन केले आणि त्या संविधानिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. “बेकायदेशीर घुसखोरांवर कायदेशीर कारवाई होते, आणि चुकीने वगळलेल्या व्यक्तींना पुनरावलोकन व दुरुस्तीची संधीही असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नेपाळ आणि बांगलादेशसारख्या शेजारी देशांतील युवकांच्या आंदोलनांबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे. “भारतीय युवक अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. ते देशाला पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि सरकार त्यांच्या हितासाठी काम करत आहे असे त्यांना वाटते. ते संविधानाचा आदर करतात आणि त्याच्या चौकटीत राहून देशाच्या विकासासाठी योगदान देतात,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
रजनीकांत आदित्य धरला म्हणाले, तू बॉक्स ऑफिसचा बाप…आदित्य धर भारावला!
चीन- पाक सीमेजवळ ‘पिनाका’ची वाढती तैनाती! २२ रेजिमेंट्सच्या तैनातीचे लक्ष्य
उन्हाळ्यात पुदीना देईल थंडावा! पोटातील उष्णता करेल कमी
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर अक्षर पटेल नाराज
ते पुढे म्हणाले की स्वातंत्र्यलढा, आणीबाणीचा काळ आणि २०१० मधील भ्रष्टाचार व महिलांवरील अत्याचारांविरोधातील आंदोलनांमध्ये भारतीय युवक रस्त्यावर उतरले होते. २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्ताराबाबत ते म्हणाले की आता सुमारे ८८ हजार शाखांमध्ये दररोज उपक्रम चालतात आणि लाखो स्वयंसेवक त्यात सहभागी होतात. संघटनात्मक रचना अधिक विकेंद्रीत करण्यासाठी नवीन विभागीय स्तर तयार करण्यात आला असून, गाव, तालुका आणि मंडळ पातळीपर्यंत पोहोच वाढवली जात आहे.
“आमचा दृष्टिकोन कायम आहे — एकता, राष्ट्रीय विकास आणि सुरक्षा यांना प्रोत्साहन देणे, जे शंभर वर्षांपूर्वी संघाच्या स्थापनेच्या तत्त्वांवर आधारित आहे,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
भाजप अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा आरएएसशी पूर्वी संबंध नसल्यामुळे कोणताही वैचारिक संघर्ष आहे का, यावर आंबेकर म्हणाले की नबीन यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले आहे आणि पक्ष आपल्या मूलभूत विचारसरणीचे प्रशिक्षण देण्यास सक्षम आहे.
