तब्बल १९ वर्षांनंतर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन या कोलकाता, बंगालमध्ये परतल्या आहेत. बंगालमध्ये सरकार बदलल्यानंतर नसरिन यांना येथे सुरक्षित वाटू लागल्याने त्या बंगालमध्ये परत आल्या. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा आपल्याला बंगालमध्ये कसे राहू दिले नाही, आपल्याला एक छोटंसं घरही इथे मिळू शकलं नाही, आपलं संरक्षणही केलं गेलं नाही, या भूतकाळाची उजळणी त्यांनी या कार्यक्रमात केली.
नसरिन यांनी तब्बल दोन दशकांनंतर कोलकात्यात परतल्यानंतर शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझे कोलकात्यात परतणे हे सिद्ध करते की अन्याय दीर्घकाळ टिकू शकतो, मात्र तो कायमस्वरूपी नसतो,” असे त्यांनी म्हटले.
कोलकात्यात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना नसरीन म्हणाल्या की, शहरात परतल्यानंतर आपल्या आयुष्यातील मागे राहिलेला एक भाग पुन्हा मिळाल्यासारखे वाटत आहे. त्यांनी भविष्यात कोणत्याही लेखकाला आपले विचार व्यक्त केल्यामुळे देश सोडण्याची वेळ येऊ नये, अशी आशाही व्यक्त केली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी ‘अपयशी’; १२ वर्षात हुकूमशहा बनले नाहीत!
पावसाळ्यात अंडी खाण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर
होर्मुझमधून तेलपुरवठ्याला पुन्हा वेग
‘मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाही’
तस्लीमा नसरीन यांनी आपल्या कोलकाता दौऱ्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले. “मी कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी येथे आलेले नाही. मी महिलांच्या हक्कांसाठी बोलण्यासाठी येथे आले आहे,” असे त्यांनी सांगितले. महिलांचे अधिकार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हीच आपल्या संघर्षाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘दोन्ही बंगालमध्ये मला छोटंसं घरही मिळालं नाही’
दीर्घकाळाच्या निर्वासित जीवनाचा उल्लेख करताना नसरीन यांनी बांगलादेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी निवारा मिळू न शकल्याची खंत व्यक्त केली. “युरोपने मला नागरिकत्व आणि राहण्यासाठी जागा दिली. मात्र दुर्दैवाने, दोन्ही बंगालमध्ये मला राहण्यासाठी एक छोटंसं घरही मिळू शकलं नाही,” असे त्या म्हणाल्या.
बांगलादेशातून इस्लामी कट्टरतावाद्यांकडून मिळालेल्या धमक्यांनंतर त्यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी युरोपमध्ये दीर्घकाळ वास्तव्य केले.
२००७ नंतर कोलकात्यातून हकालपट्टी
तस्लीमा नसरीन २००४ ते २००७ या काळात कोलकात्यात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांच्या ‘द्विखंडित’ या आत्मचरित्रामुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांना शहर सोडावे लागले. २००७ मध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोलकाता सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांचे आयुष्य दीर्घकाळ निर्वासित अवस्थेत गेले. तेव्हा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील डाव्यांचे सरकार बंगालमध्ये होते.
‘कोणत्याही न्यायालयाने मला शिक्षा केलेली नाही’
आपल्या विचारांमुळे मोठी किंमत मोजावी लागल्याचे सांगताना नसरीन यांनी म्हटले की, त्यांच्याविरोधात कोणत्याही न्यायालयाने दोषसिद्धी केलेली नाही. “कोणत्याही न्यायालयाने मला शिक्षा केलेली नाही. मात्र कट्टरतावाद्यांमुळे मला त्याची मोठी किंमत मोजावी लागली,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल लेखकाला देश किंवा शहर सोडण्यास भाग पाडले जाणे ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे.
नसरीन यांच्या पुनरागमनामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे अधिकार, धार्मिक कट्टरतावाद आणि लेखकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या दीर्घ निर्वासित जीवनानंतरच्या कोलकाता पुनरागमनाला केवळ वैयक्तिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि वैचारिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
