मी नेहमी माणसांच्या दुनियेतच जगत असतो. चांगल्या-वाईट लोकांना भेटत राहतो. त्यांच्यातून काही २४ कॅरेट सोन्यासारखे लोक सापडतात, आणि त्यांना मी सतत स्वतःशी जोडून ठेवतो. अलीकडेच माझी ओळख राजकारणाशी संबंधित एका व्यक्तीशी झाली. पहिल्याच भेटीत त्यांच्या बद्दल थोडी उत्सुकता निर्माण झाली, कारण त्यांचा स्वभाव, वागण्याची शैली आणि विचार करण्याची पद्धत सर्वस्वी वेगळी होती. आज मी लिहित आहे आपले मित्र डॉ. अभिषेक वर्मा यांच्याबद्दल.
आमचे चोवीस तास कामाचे असतात, त्यामुळे भेटीगाठी हा कामाचाच भाग असतो. डॉ. अभिषेशकडूनही अशीच कामाच्या संदर्भात भेट झाली. माझे मित्र, ज्योतिषशास्त्राचे जाणकार संदीप नेने गुरुजी यांनी त्यांना माझे नाव सुचवले होते. एक महत्त्वाचे काम घेऊन ते माझ्याकडे आले आणि पहिल्या भेटीतच आमच्यात मनमोकळ्या गप्पांची सुरुवात झाली.
डॉ. अभिषेक यांची राजकीय परंपरा अत्यंत मोठी व जुनी आहे. त्यांचे वडील श्रीकांत वर्मा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, १२ वर्षे खासदार आणि काँग्रेसचे महासचिव होते. त्यांनी एकदा वीर सावरकर आणि त्यांच्या त्याग-बलिदानाची स्तुती करणारा लेख लिहिला होता. या लेखाच्या परिणामी १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना बोलावून महासचिवपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. श्रीकांत वर्मा हे प्रसिद्ध कवी व लेखकही होते. त्यांची माता वीणा वर्मा या देखील काँग्रेस नेत्या, १८ वर्षे खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या. मला आश्चर्य वाटते की, अशी राजकीय पार्श्वभूमी असूनही डॉ. अभिषेक यांनी करिअरची सुरुवात राजकारणात न करता कॉर्पोरेट जगतातून केली कशी? त्यांची पत्नी अंका वर्मा पूर्व मिस युनिव्हर्स रोमानिया असून भारतात सक्रिय समाजसेविका आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगांशी जोडलेल्या आहेत.
हे ही वाचा:
अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीवर सेबीकडून ५४६ कोटी रुपयांची जप्ती
एका महिन्यात ४५ हजार ९११ सौर पंप बसवून महाराष्ट्र गिनीज बुकात
“पंतप्रधान मोदी दबावापुढे सहज झुकणारे नेते नाहीत”
जरी कुटुंब काँग्रेसशी संलग्न असले तरीही त्यांचे घराणे आणि स्वतः डॉ. अभिषेक कट्टर सनातनी आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी नृत्य गोपाल दास महाराज यांनी त्यांना ‘सनातन योद्धा’ ही उपाधी दिली आहे. ते मथुरा येथील दीनदयाल उपाध्याय गौशाला इंस्टिट्यूट, तसेच संघाशी संबंधित अनेक संस्थांसोबत कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून ते हिंदुत्व आणि सनातन धर्माचा प्रसार भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर करत आहेत. त्यांना ठाम विश्वास आहे की सनातन धर्माचे तत्त्वज्ञान जगभर पसरले पाहिजे.
सनातन आणि न्यायाच्या बाजूने उभे राहण्याच्या या स्वभावामुळेच २०१२ मध्ये त्यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील एका प्रकरणात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरुद्ध साक्ष देण्याचा धाडसी निर्णय घेतला. टायटलर यांच्यावर शीखांच्या हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. या निर्णयानंतर २०१२ मध्ये, काँग्रेसच्या दबावाखाली, बदला घेण्याच्या हेतूने सीबीआय आणि ईडी यांनी डॉ. अभिषेक यांच्यावर अनेक खोटे गुन्हे लादले. त्यांनी वर्षानुवर्षे न्यायालये, कोठड्या भोगल्या, पण शेवटी जवळपास दहा वर्षांच्या लढाईनंतर ते सर्व प्रकरणांतून निर्दोष सुटले आणि सत्य बाहेर आले.
कॉर्पोरेट क्षेत्रात डॉ. अभिषेक वर्मा हे अब्जाधीश उद्योगपती म्हणून परिचित आहेत. दीर्घकाळ त्यांचा संबंध संरक्षण उद्योगाशी होता. १९९७ मध्ये फक्त २९ वर्षांच्या वयात त्यांना भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून मान्यता मिळाली आणि नोव्हेंबर १९९७ च्या इंडिया टुडेच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र झळकले. अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. मात्र त्यांचे झुकाव समाजसेवा आणि राजकारणाकडे होते. ३० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत दाखल झाले. पक्षाने त्यांना रालोआ (एनडीए) चे मुख्य राष्ट्रीय समन्वयक ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेचा विस्तार करणे आणि रालोआ सोबत समन्वय राखणे ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते आता विशेषतः दिल्लीमध्ये पार्टीचे काम पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्वाच्या विचारांनी आणि एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे वडील बाळासाहेबांचे निकटचे होते आणि मुंबईला आल्यावर डॉ. अभिषेक यांना सोबत घेऊन त्यांच्याकडे जात असत. त्या सत्संगांमधून अभिषेक यांच्या मनात बालपणापासूनच हिंदुत्वाविषयी आदर निर्माण झाला आणि त्याच प्रेरणेतून ते शिवसेनेत आले.
कोणत्याही क्षेत्रात यश हवे असेल तर व्यवस्थापन कौशल्य अनिवार्य आहे. डॉ. अभिषेक यांच्यात याचा अभाव नाही. लक्ष्य ठरवणे, रोडमॅप बनवणे आणि वेगाने काम करणे ही त्यांची शैली आहे. राजकारणात अशा लोकांचीच कमतरता जाणवते; पण ज्यांनी हा पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारला, त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांच्यासाठी राजकारणात प्रवेश नवीन असला तरी राजकारण नवीन नाही ते ते लहानपणापासून पाहत आले आहेत. लोकांना जोडण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे. एकदा भेटलेला मनुष्य त्यांना कायम लक्षात राहतो. त्यांच्याबद्दल असेही म्हणतात की ते मित्रांसाठी प्रामाणिक, तर प्रतिस्पर्ध्यासाठी अतिशय कठोर आणि अढळ विरोधक ठरतात. त्यांच्याकडे माणसांना आकर्षित करणारे एक विलक्षण चुंबकत्व आहे. त्यांची स्मरणशक्ती संगणकासारखी…काही दशकांपूर्वील तपशीलही त्यांना तंतोतंत आठवतो. एका क्षेत्रात उतरल्यानंतर त्यात प्रगती करणे ही त्यांची नैसर्गिक क्षमता आहे. त्यामुळे मला त्यांच्या राजकीय यशाबद्दल कणभरही शंका नाही.
अजून तर त्यांनी फक्त सुरुवात केली आहे. बर्याच जणांचे राजकारणात येण्याचे कारण पैसा असते आणि तिथूनच त्यांचा ऱ्हास सुरू होतो. पण डॉ. अभिषेक यांनी आधी उद्योगक्षेत्रात प्रचंड यश मिळवले… अब्जावधी नव्हे तर खरबो कमवले! त्यामुळे आता त्यांना देश-समाजासाठी काही भरीव करायचे आहे. येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव घुमताना ऐकले, तर आश्चर्य वाटू देऊ नका. आमच्यासारख्या खऱ्या मित्रांचे मजबूत साथ-आशीर्वाद तर नेहमीच त्यांच्यासोबत असतील.
