भारत आणि ब्राझील एकत्रितपणे हवामान बदलावर उपाय शोधणार!

भारतातील ब्राझीलचे राजदूत केनेथ नोब्रेगा यांचे वक्तव्य

भारत आणि ब्राझील एकत्रितपणे हवामान बदलावर उपाय शोधणार!

“भारत आणि ब्राझीलकडे हवामान बदलाच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी जगाला देण्यासारखे खूप काही आहे. आगामी COP३० परिषद यशस्वी होण्यासाठी आम्ही भारताच्या पाठिंब्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत,” असे प्रतिपादन भारतातील ब्राझीलचे राजदूत केनेथ फेलिक्स हाचिन्स्की दा नोब्रेगा यांनी केले आहे.

अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्कांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, “भारत या नव्या भू-राजकीय परिस्थितीत उद्भवणाऱ्या संधी शोधत आहे. आम्ही विविध उपक्रमांवर एकत्र काम करण्याचे मार्ग शोधत आहोत. आमच्या देशातल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू आहे.”

हवामान बदल ही दीर्घकालीन समस्या असल्याचे नमूद करत त्यांनी पुढे सांगितले की, “हवामान बदलाचा आपल्या समाजांवर परिणाम होऊ नये यासाठी दूरगामी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन काम करत आहोत.”

भारताकडून ब्राझीलकडे G२० अध्यक्षपदाची झालेली हातांतरण प्रक्रिया अत्यंत सौहार्दपूर्ण व सकारात्मक झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “G२० अध्यक्षपदाची जबाबदारी दोन बंधुत्व जपणाऱ्या देशांनी परस्पर सहकार्याने दिली आहे, हे एक यशस्वी उदाहरण आहे. भारताच्या अध्यक्षपदाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत,” असेही राजदूत नोब्रेगा यांनी स्पष्ट केले.

COP३० परिषद म्हणजे काय?

COP३० ही संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद (United Nations Climate Change Conference) आहे, जी १० नोव्हेंबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ मध्ये ब्राझीलमधील बेलम (Belém), पारा प्रांत येथे आयोजित होणार आहे. COP म्हणजे Conference of the Parties – हवामान बदलासंदर्भातील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क (UNFCCC) अंतर्गत दरवर्षी होणारी आंतरराष्ट्रीय परिषद.

हे ही वाचा : 

डब्ल्यूएफपी कर्मचाऱ्यांना अटक

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना हा झटका!

शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पहलगाम हल्ल्याचा एससीओ देशांकडून तीव्र निषेध!

पंतप्रधान मोदी आणि पुतिन तिथून गेले, शाहबाज शरीफ पाहतच राहिले!

COP३० चे उद्दिष्ट काय आहे?

COP३० चा मुख्य उद्देश जागतिक हवामान बदलावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्रित कृतीस प्रोत्साहन देणे हा आहे. यात पुढील गोष्टींवर भर दिला जातो:

  1. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाय

  2. २०२३ मधील ग्लोबल स्टॉकटेक (Global Stocktake) चा आढावा घेणे

  3. पॅरिस करारातील (Paris Agreement) उद्दिष्टे पूर्ण करण्याची दिशा ठरवणे

  4. विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक मदत पुरवण्याचे नियोजन

  5. हवामान न्याय (Climate Justice) – गरजू देशांना मदतीची हमी देणे

    भारताची भूमिका

    भारत हा विकसनशील देशांचा आवाज म्हणून COP परिषदांमध्ये सक्रिय असतो. हवामान बदलाविरुद्ध लढण्यासाठी भारताने “LiFE – Lifestyle for Environment” ही संकल्पना मांडली आहे, जी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देते.

    COP३० मध्ये भारताकडून पुढील गोष्टींवर भर असण्याची शक्यता आहे:

    • स्वच्छ ऊर्जा (सौर, पवन)

    • हरित तंत्रज्ञान

    • कार्बन क्रेडिट व्यापार

    • हवामान बदलामुळे प्रभावित समुदायांसाठी मदत

Exit mobile version