शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स १,३५३ अंकांनी कोसळला

बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सवर मोठा परिणाम

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स १,३५३ अंकांनी कोसळला

भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स तब्बल १,३५३ अंकांनी घसरत ७९,७७३ अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ३४६ अंकांनी घसरून २४,०५५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टीने २४,१०० च्या खाली घसरण नोंदवली. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. एका दिवसात बाजारमूल्यात सुमारे ६ ते ७ लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात अस्थिरता वाढल्यामुळे भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम दिसून आला.
हे ही वाचा:
नवी दिल्लीहून मँचेस्टरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा यु- टर्न!

चिनी रिफायनरीकडे रांगा, म्हणून भारताकडे याचना

दबावाचे राजकारण सुरू असलेल्या जगात भारत कूटनीतीत आघाडीवर

इराण युद्धाचा परिणाम रुपया ऐतिहासिक नीचांक पातळीवर

या घसरणीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे पश्चिम आशियात वाढलेला संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. भारत आपल्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे तेलाचे दर वाढल्यास देशातील महागाई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली.

बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या बँकांच्या शेअर्समध्येही २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

क्षेत्रनिहाय पाहता, बँकिंग, वित्तीय सेवा, धातू आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. निफ्टी बँक निर्देशांकातही जवळपास १,००० अंकांची घसरण झाली. दरम्यान, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतल्याने बाजारावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) काही प्रमाणात खरेदी करून बाजाराला आधार देण्याचा प्रयत्न केला.

तज्ज्ञांच्या मते, जर पश्चिम आशियातील संघर्ष अधिक वाढला आणि कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या वर कायम राहिले, तर त्याचा परिणाम भारताच्या चालू खात्यावर, महागाईवर आणि आर्थिक वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस शेअर बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version