भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला जात असून ‘सर्वोच्च करार’ (mother of all deals) म्हणून याकडे पहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे कौतुक केले आणि म्हटले की, यामुळे भारतातील उत्पादनाला मोठी चालना मिळेल. युरोपियन कौन्सिलसोबतच्या या मुक्त व्यापार करारानंतर सेवा क्षेत्राचाही विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले. गोव्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच स्वाक्षरी झालेल्या भारत- युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराचे (एफटीए) कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एक मोठा करार झाला. जगभरातील लोक ‘सर्वोच्च करार’ म्हणून त्याची चर्चा करत आहेत. हा करार भारताच्या १.४ अब्ज लोकांसाठी आणि युरोपियन देशांमधील लाखो लोकांसाठी एक मोठी संधी घेऊन येतो. हा करार जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पंतप्रधानांनी नमूद केले की भारत- ईयू मुक्त व्यापार करार जागतिक जीडीपीच्या जवळपास २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळजवळ एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो, त्याचे धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करते. पुढे ते म्हणाले की, “ईयूसोबतच्या या व्यापार करारामुळे उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि सेवा क्षेत्राचाही विस्तार होईल. मुक्त व्यापार करारामुळे प्रत्येक गुंतवणूकदार आणि व्यावसायिकाचा भारतात गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास वाढेल.”
“युरोपियन संघासोबत झालेल्या व्यापार कराराचा देशातील उत्पादन आणि सेवा दोन्ही क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम होईल. मुक्त व्यापार करारामुळे भारतावरील जागतिक विश्वास वाढेल. “हा मुक्त व्यापार करार जगभरातील व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी भारतावरील जागतिक विश्वास आणखी मजबूत करेल,” असे नरेंद्र मोदी म्हणाले
हे ही वाचा :
हवालदाराची सव्वा चार लाखांची फसवणूक; ड्युटीवर असताना परस्पर काढले ‘पर्सनल लोन’
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!
अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका उडणार?
“पाकिस्तानचा एकमेव अजेंडा म्हणजे भारताला नुकसान पोहोचवणे
भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार, जो पहिल्यांदा २००७ मध्ये सुरू झाला होता, तो जागतिक व्यापार गतिमानता बदलत असताना व्यापक आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीला आधार देईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी, ‘mother of all deals’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि आज भारत-ईयू शिखर परिषदेदरम्यान त्याची घोषणा केली जाईल. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन नवी दिल्ली येथे होणाऱ्या १६ व्या ईयू-भारत शिखर परिषदेत ईयूचे प्रतिनिधित्व करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेचे आयोजन करतील.
