पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि जमावाच्या गोंधळप्रकरणी आतापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या प्रकरणाची चौकशी आपल्या हाती घेतली असून, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
नॉर्थ बंगालचे एडीजी के. जयरामन यांनी माहिती दिली की आतापर्यंत या प्रकरणी १९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. मुख्य आरोपी म्हणून मोफक्करुल इस्लाम याला अटक करण्यात आली असून, त्याला बागडोगरातून ताब्यात घेऊन मालदाला आणले जात आहे. तो AIMIM पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) घडली. तीन महिला अधिकाऱ्यांसह एकूण सात न्यायिक अधिकाऱ्यांना सुमारे ९ तास जमावाने घेरून ओलीस ठेवले होते. हे अधिकारी राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेअंतर्गत आपले कर्तव्य बजावत होते. ही घटना कालियाचक II ब्लॉक विकास कार्यालयात घडली, जिथे अधिकारी मतदार यादीसंबंधी आक्षेपांवर सुनावणी करत होते. त्याचवेळी संतप्त जमावाने त्यांना वेढा घातला.
माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ४ वाजल्यापासून जमावाने इमारतीला चारही बाजूंनी वेढा घातला होता, त्यामुळे अधिकारी बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना खाणे- पिणेही देण्यात आले नाही. आंदोलनकर्त्यांनी जवळील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गही बंद केले, ज्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. रात्री सुमारे १ वाजता मोठ्या पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या मदतीने लाठीचार्ज करून जमाव पांगवण्यात आला आणि अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. गुरुवारी (३ मार्च) देखील मालदामधील परिस्थिती पूर्णपणे शांत नव्हती. पुन्हा एकदा हिंसाचार उसळला, ज्यात पोलिसांच्या वाहनावर हल्ला झाला आणि चालक जखमी झाला.
हे ही वाचा:
‘समोशांबद्दल’ बोलण्याऐवजी भाजपला संसदेत प्रश्न विचारा!
“नाही म्हणजे नाही!” ६ कोटी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार नाही
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला
अमेरिकन F-35 लढाऊ विमान पाडले?
हा संपूर्ण वाद राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह वोटर रिव्हिजन (SIR) प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांचा आरोप आहे की वैध मतदारांची नावे यादीतून वगळली जात आहेत, त्यामुळे संताप वाढून परिस्थिती हिंसक बनली. पोलिस आता याचीही चौकशी करत आहेत की अधिकाऱ्यांना वाचवण्यात उशीर का झाला, कारण ते सतत संपर्क साधून मदतीची विनंती करत होते. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणुकीपूर्वी राज्यातील सुरक्षा आणि प्रशासनाच्या तयारीबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
