उत्तर भारतात पसरलेल्या अवैध शस्त्रास्त्र आणि दारुगोळा तस्करी नेटवर्क विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवार, ६ एप्रिल रोजी मोठी कारवाई केली आहे. बिहारमधील नालंदा येथे एकाच वेळी १० ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई सकाळपासून सुरू झाली असून एनआयएच्या अनेक पथकांनी राज्य पोलिसांच्या मदतीने संशयितांच्या ठिकाणी झडती मोहीम राबवली.
हा गुन्हा मागील वर्षी नोंदवण्यात आला होता. तपासात असे उघड झाले की हे नेटवर्क बिहारमधून कार्यरत असून उत्तर भारतातील अनेक राज्यांपर्यंत पसरलेले आहे. एजन्सीनुसार, हा गट हरियाणातील विविध गन हाऊस मधून बेकायदेशीररीत्या दारुगोळा मिळवत होता आणि उत्तर प्रदेशमार्गे बिहारसह इतर भागात त्याची पुरवठा साखळी चालवत होता. या प्रकरणात एनआयएने आधीच अनेक महत्त्वाच्या अटक केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये एजन्सीने या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार कमलकांत वर्मा उर्फ ‘अंकल जी’ याला पटना येथून अटक केली होती. तो या प्रकरणातील ११ वा आरोपी असून नेटवर्क चालवणे आणि पुरवठा साखळी कायम ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात समोर आले आहे.
यापूर्वी ४ डिसेंबर २०२५ रोजी एनआयएने उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा येथे 23 ठिकाणी छापेमारी केली होती. त्या वेळी रवि रंजन, शशि प्रकाश, विजय कालरा आणि कुश कालरा यांच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व दारुगोळा जप्त करण्यात आला होता. सद्याची छापेमारी या नेटवर्कची संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तपास अजून सुरू असून पुढे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अमेरिकन वैमानिकाच्या सुटकेसाठी ३६ तासांची मोहीम; इराणमधून कसे काढले बाहेर?
गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त
आपत्तीग्रस्त अफगाणिस्तानला भारताने दिला माणुसकीचा हात
रिनिकी सरमा वादात काँग्रेसचा ‘फेक’ गेम उघड!
दरम्यान, एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन बांग्लादेशी नागरिक राहुल उर्फ फैसल करीम मसूद आणि आलमगीर हुसेन यांच्या कोठडीत आणखी नऊ दिवसांची वाढ केली आहे. दोघांना मार्च महिन्यात पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती आणि नंतर ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले. या दोघांवर बंगलादेशातील राजकीय कार्यकर्ता शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येचा आरोप आहे. तपासानुसार, ते मेघालय सीमेमार्गे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केले होते आणि बोंगाव येथे बांग्लादेशात परत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले गेले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कोठडी वाढवण्याचा आदेश दिला.
