मुंबईतील अंधेरी परिसरात एका अल्पवयीन मुलाची त्याच्याच दोन मित्रांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गजाआड करण्यात आलेले दोन्ही आरोपी देखील अल्पवयीन असून, कामाच्या ठिकाणची तक्रार आणि बहिणीबद्दल केलेले अपमानास्पद वक्तव्य या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अंधेरी पूर्व येथील गणेश नगर परिसरात एका घरात १५ आणि १७ वर्षांचे दोन तरुण आपल्या एका १५.५ वर्षांच्या मित्रासोबत राहत होते. हे तिघेही मूळचे बिहारचे असून अंधेरीतील एका हॉटेलमध्ये काम करायचे. मृत मुलगा हा १५ वर्षांच्या आरोपीचा नातेवाईक असल्याचे समजते.
हे ही वाचा:
पश्चिम आशियातील युद्धात भारताला दिलासा
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी बिष्णोई टोळीचा ‘गोलू’ आग्र्यातून जेरबंद
भारताने शोधला नवा मार्ग… आता होर्मुझवर अवलंबित्व नाही, इथून येत आहे तेलाचा साठा
इराणवरील हल्ल्यासाठी भारतीय भूभागाच्या वापराची परवानगी मागितल्याच्या बातम्या खोट्या!
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोघा आरोपींनी मिळून पीडित मुलाचा कापडाने गळा आवळला. ही घटना घडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डी.एन. नगर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हत्येमागे दोन मुख्य कारणे समोर येत आहेत. पीडित मुलाने आरोपींच्या विरोधात हॉटेल मालकाकडे तक्रार केली होती, ज्यामुळे मालकाने त्यांना ओरडले होते. त्याचाच राग मनात धरून ही हत्या केली असावी. पीडित मुलगा हा १५ वर्षीय आरोपीच्या बहिणीबद्दल अपशब्द बोलत होता, ज्याचा त्याला राग होता.
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डी.एन. नगर पोलिस करत आहेत.
