मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सहीचे बनावट पत्र तयार करून एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी वरळी परिसरात खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आले असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तौसीफ पटेल (वय ४४) आणि सिद्धिनाथ पांडे उर्फ सुनील (वय ४३) अशी असून, दोघेही गोरेगाव परिसरातील रहिवासी आहेत.
हे ही वाचा:
भारत-रशिया ब्रह्मोस मागच्या ‘मास्टरमाइंड’चे निधन
रिनिकी सरमा वादात काँग्रेसचा ‘फेक’ गेम उघड!
जेवणानंतर गोड खाण्याची सवय का लागते? शरीर देतंय महत्त्वाचा इशारा
पाकिस्तानला नवी खुमखुमी, म्हणतो आम्ही कोलकातापर्यंत शिरू!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) चालवतात. ही संस्था गरजू मुलांना शैक्षणिक मदत देण्यासोबतच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना सहाय्य करते. समाजकार्याच्या या कामाचा गैरफायदा घेत आरोपींनी तक्रारदारांना लक्ष्य केले. मार्च महिन्यात आरोपींनी स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदारांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्याचे भासवणारे बनावट पत्र तयार करून तक्रारदारांकडून पैशांची मागणी केली. या पत्रावर पंतप्रधानांची बनावट सही करण्यात आली होती.
दरम्यान, संशय आल्याने तक्रारदारांनी मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. वरळी येथे पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, आरोपींनी अशा प्रकारे इतर कोणाला फसवले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
