*खालिद का शिवाजी* या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, यासाठी आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं सादर करण्यात आली. विविध शिवभक्त हिंदुत्ववादी संघटनांनी हा चित्रपट पूर्णपणे बंद करावा, ही विनंती शासनाला केली आहे.
मंगळवार ५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या चित्रपटासाठीचे पुरस्कार तसेच *छत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्कार* हा गड किल्ले दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेसाठीचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला जाणार होता. *खालिद का शिवाजी* या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या चित्रपटाचा निषेध व विरोध करण्यासाठी येथे जाण्यासाठी शिवशंभू विचार मंचचे कोकणप्रांत संयोजक अभय जगताप यांनी दुपारी ४/४.३० वाजता आवाहन केल्यानंतर अमित घाटये त्यांच्यासोबत जाण्यासाठी उपलब्ध झाले.
या दोघांनी वरळी डोम येथील मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमात आपला आवाज, आपला या चित्रपटाला असलेला विरोध प्ले कार्ड फडकावित ओरडून मुख्यमंत्री भाषणाला उभे असताना पोहोचवला. पोलिसांनी तात्काळ या शिवभक्तांना ताब्यात घेतले व ताडदेव पोलिस स्टेशनला नेले.
हा वणवा बघता बघता महाराष्ट्रभरात पोहोचला. चार दिवस झोपलेल्या मिडियालाही जाग आली आणि वाहिन्यांनी आपले डिबेट या विषयावर सुरू केले. शिवशंभू विचार मंचच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी इतिहासप्रेमी दुर्गप्रेमी संघटनांना हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
हे ही वाचा:
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा ‘एनडीए’ला भक्कम पाठिंबा!
या ४५ कोटींमध्ये आहे, ट्रम्प यांना हरवण्याची ताकद
भारत आणि रशियामध्ये संरक्षण भागीदारी वाढवण्यावर चर्चा
विरोधी पक्षाला संसद चालू ठेवायचीच नाही
शिवशंभू विचार मंच मुंबई महानगराच्या वतीने *खालिद का शिवाजी* या चित्रपटात असलेल्या प्रमुख आक्षेपांबाबत बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं सादर केले. यात प्रामुख्याने चित्रपटाच्या नावातच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ही खटकणारी गोष्ट आहे.तसेच या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या ट्रेलर मध्ये दाखविण्यात आलेल्या महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते , महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते आणि महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती अशी धादांत खोटी माहिती पेरण्यात आल्याचे आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करु नये अशी विनंती शासनाला केली आहे.
यासंदर्भात शिवशंभू विचार मंचचे अभय जगताप म्हणाले की, इतिहासाचे विकृतीकरण थांबवा. धादांत खोटे विषय महाराजांच्या बाबतीत या चित्रपटात आहेत, ते खपवून घेतले जाणार नाहीत. हा चित्रपट पुर्णपणे बंद करण्यात यावा व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी. अन्यथा शिवभक्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.
जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने हे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवशंभू विचार मंचचे मुंबई महानगर संयोजक प्रमोद काटे , नवी मुंबई संयोजक पंकज भोसले , सिंधुदुर्ग संयोजक भुषण साटम , अविनाश येवले , गणेश पाटील आणि आम्ही स्वच्छंदी फौंडेशनचे अमित घाटये हे उपस्थित होते. निवेदन सादर करण्यापूर्वी हा चित्रपट पुर्णपणे बंद करण्यात यावा यासाठी घोषणा देण्यात आल्या.
