भारत आणि चीन यांच्यातील सीमा विषयक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारत-चीन सीमा व्यवहारांवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्य यंत्रणेची (WMCC) ३६ वी बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत सीमा निर्धारण, सीमा व्यवस्थापन, सीमावर्ती सहकार्य आणि नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजीत घोष यांनी केले, तर चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक होउ यानकी यांनी केले.
बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये खुली आणि सविस्तर चर्चा झाली. विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणि सीमावर्ती भागातील शांतता व स्थैर्य कायम राखण्यावर भर देण्यात आला. सीमावर्ती भागात शांतता राखणे हे भारत-चीन संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले.
यावेळी दोन्ही देशांनी डब्ल्यूएमसीसी, स्थानिक लष्करी कमांडर स्तरावरील बैठका आणि इतर राजनैतिक व लष्करी संवाद यंत्रणांचा वापर सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली. उर्वरित प्रलंबित प्रश्न सोडवणे तसेच एलएसीवर गैरसमज किंवा चुकीच्या आकलनामुळे तणाव निर्माण होऊ नये, यासाठी नियमित संवाद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
२४ व्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर सीमा निर्धारण, सीमा व्यवस्थापन, आवश्यक यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. भारताने विशेषतः सीमापार नद्यांबाबत तज्ज्ञ स्तरावरील पुढील बैठक लवकर घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच चीनने सीमावर्ती नद्यांवरील उगम भागात सुरू असलेल्या प्रकल्पांची तांत्रिक माहिती वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही भारताने पुन्हा केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक सकारात्मक पावले उचलल्याचे सांगितले होते. त्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे आणि दोन्ही देशांतील नागरी हवाई सेवा पुन्हा सुरू करणे यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दोन्ही देशांमधील संवाद सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे सांगितले. भारत आणि चीनमधील जनतेतील परस्पर संपर्क वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, त्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालय कधी सुरू होणार? राजेश शर्मांची अवमान याचिका
छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर
सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?
भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला ‘टॉप गन’
चीनमधील सामाजिक माध्यमांवर भारतीय आणि भारतीय संस्कृतीविरोधात आक्षेपार्ह मजकूर वाढत असल्याबाबत भारतीय समुदायाने व्यक्त केलेल्या चिंतेचीही दखल भारताने घेतली आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या ‘ओपन फोरम’मध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याबाबतही दोन्ही देशांमधील संवादाच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.
