नेपाळच्या मधेश प्रांतात सांप्रदायिक तणावाने हिंसक वळण घेतल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रशासनाने पाच जिल्ह्यांत अनिश्चितकालीन संचारबंदी लागू केली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. भारत-नेपाळ सीमेलगतच्या या भागात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनसरी जिल्ह्यातील कप्तानगंज परिसरात धार्मिक ध्वज आणि कावड यात्रेदरम्यान डीजे वाजवण्याच्या वादातून दोन समुदाय आमनेसामने आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचारात झाले. संतप्त जमावाने अनेक वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला तसेच काही ठिकाणी गोळीबारही करावा लागला. या कारवाईत आणि त्यानंतरच्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील कोळसा खाणीत भीषण स्फोट
वंदे भारत ठरली लाईफलाईन; प्रथमच जिवंत हृदयाची वाहतूक
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा
जुलैमध्ये शेअर बाजाराची दमदार कामगिरी
हिंसाचाराचा परिणाम केवळ एका भागापुरता मर्यादित न राहता सुनसरीसह सिराहा, धनुषा, जनकपूर आणि सरळाही या भागांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संचारबंदी लागू करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक सेवांवरही या घटनेचा परिणाम झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नेपाळ सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयानेही अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सध्या संपूर्ण परिसरात तणाव कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
