संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीकास्त्र डागत त्यांचा दुटप्पी चेहरा जगासमोर आणला आहे. महिला, शांतता आणि सुरक्षा या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करताच संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.
चर्चेदरम्यान पाकिस्तान अधिकाऱ्याने म्हटले की, काश्मिरी महिलांनी अनेक दशकांपासून लैंगिक हिंसाचार सहन केला आहे. हा आरोप करताच राजदूत पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानला त्यांच्या देशातील काही घटनांची आठवण करून दिली. पर्वतानेनी हरीश म्हणाले की, महिला, शांतता आणि सुरक्षा या विषयावर आमचा रेकॉर्ड निष्कलंक आणि अबाधित आहे. जो देश स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करतो, पद्धतशीर नरसंहार करतो तो केवळ चुकीच्या दिशानिर्देशाने आणि अतिरेकी प्रचाराने जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे हरीश म्हणाले. “स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट” ही टिप्पणी गेल्या महिन्यात खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या हवाई हल्ल्यात मुलांसह ३० हून अधिक लोक मारले गेले त्या संदर्भात होती.
१९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइट दरम्यान ४,००,००० महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या मोहिमेबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर टीका केली. तसेच पाकिस्तानवर विशेषतः जम्मू आणि काश्मीरबाबत खोटे आरोप सुरू ठेवल्याबद्दल टीका केली.
हे ही वाचा :
टिलामोडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
बॉबी देओलची इंडस्ट्रीत ३० वर्ष पूर्ण
बॉलिवूडमधील एकमेव सोलो महिला संगीतकाराची कहाणी…
राजदूत पर्वतानेनी हरीश यांनी १९७१ च्या ऑपरेशन सर्चलाइटचा उल्लेख केला, ज्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये लोकांविरुद्ध क्रूर कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान, लाखो महिलांना ताब्यात घेण्यात आले आणि वारंवार त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या कारवाईचे पर्यवेक्षण पाकिस्तानचे कुख्यात लष्करी कमांडर जनरल टिक्का खान यांनी केले होते, ज्यांना ‘बंगालचा कसाई’ असे टोपणनाव देण्यात आले होते. १९७१ च्या युद्धादरम्यान हे क्रूर कृत्य घडले, ज्यामुळे अखेर बांगलादेशची निर्मिती झाली कारण पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि ढाका येथे बिनशर्त आत्मसमर्पण केले. राजदूत पर्वतानेनी हरीश म्हणाले की, हा असा देश आहे ज्याने १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइट चालवले आणि स्वतःच्या सैन्याने ४,००,००० महिला नागरिकांवर सामूहिक बलात्कार करण्याची पद्धतशीर मोहीम राबवली.
