परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (१ ऑगस्ट) पुष्टी केली की येमेनमध्ये भारतीय नागरिक निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. तथापि, मृत्युदंड पूर्णपणे रद्द करण्याचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात प्रसारित होणाऱ्या निराधार वृत्तांपासून आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन मंत्रालयाने जनतेला आणि माध्यमांना केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, सरकार प्रिया आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि मैत्रीपूर्ण सरकारांशी जवळून काम करत आहे.
साप्ताहिक ब्रीफिंग दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “ही एक संवेदनशील बाब आहे. भारत सरकार या प्रकरणात सर्वतोपरी मदत करत आहे. आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि सर्वतोपरी मदत करत आहोत.”
हे ही वाचा :
आक्षेपार्ह पोस्टमुळे दौंड तालुक्याच्या यवतमध्ये दोन गट आमनेसामने!
दुर्धर आजाराने त्रस्त आईने घेतला पोटच्या बाळाचा जीव
‘बनावट’ पोलिसांनी घरात घुसून ट्रान्सफर करून घेतले ९० हजार
१६ जुलै रोजी होणारी फाशीची तारीख आधी ठरलेली होती, पण राजनैतिक हस्तक्षेप आणि भारत सरकारच्या नेतृत्वाखालील वाटाघाटींमुळे ती पुढे ढकलण्यात आली. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की त्यांची फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केल्याचा दावा करणारे वृत्त खोटे आहे. ते म्हणाले, “आम्ही या मुद्द्द्यावर काही मित्र देशांच्या सरकारांशीही संपर्कात आहोत. आम्ही सर्वांना चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.”
