उत्तराखंड दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

उत्तराखंड दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

अमित शहांची लोकसभेत ग्वाही

केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना ग्वाही दिली की उत्तराखंडमधील चमोली येथील जल विद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य युद्ध पातळीवर चालू आहे. रविवार ७ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर अजूनपर्यंत बचाव कार्य चालू आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये महापूर

या अपघाताबाबत अधिक माहिती लोकसभेत देताना, अमित शहा यांनी सांगितले की सुमारे २५-३५ लोक राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) दुसऱ्या बोगद्यात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांचे बचाव कार्य युद्धपातळीवर चालू आहे.

एनटीपीसीच्या एका बोगद्यातून १२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. ऋषिगंगा प्रकल्पातील १५ लोकांना वाचवण्यातही यश आले आहे. असे, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

याबरोबरच इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) एक कंट्रोल रुम स्थापन केली आहे. त्याशिवाय त्यांचे ४५० जवान घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

मंत्री महोदयांनी अशीही माहिती दिली की नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) पाच तुकड्या तैनात असून लष्कराच्या आठ तुकड्या, वैद्यकीय मदत पथक आणि ऍम्ब्युलन्सदेखील घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे. त्याबरोबरच नौदलातील पाणबुड्यांचे एक पथकही तैनात केले जाईल.

बचाव कार्यात हवाई दलाचेही सहाय्य घेण्यात आले आहे. यासाठी ५ हेलिकॉप्टर तैनात केली गेली असून लष्कराचे एक नियंत्रण केंद्र जोशीमठ येथे उभारण्यात आले आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे.

Exit mobile version