बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. काही अज्ञात लोकांनी दगड आणि इतर वस्तू त्यांच्या ताफ्यावर फेकल्यामुळे खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय जनता दल (RJD) वर हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.
लखीसराय मतदारसंघातून बिहार विधानसभा निवडणूक लढवणारे तीन वेळा आमदार असलेले सिन्हा यांनी दावा केला की, खोरियारी गावातील त्यांच्या भेटीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजद समर्थकांनी हा हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात सिन्हा यांच्या वाहनाभोवती उभी असलेली गर्दी दिसत असून यासोबतच घोषणाबाजी सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच ही गर्दी त्यांच्या ताफ्याला पुढे जाण्यापासून रोखत होती. अनेक लोक घोषणाबाजी करत असताना त्यांच्या ताफ्याला गावात प्रवेश करण्यापासून रोखत होते.
“ताफा अडवणारे हे राजदचे गुंड आहेत. त्यांना माहित आहे की एनडीए पुन्हा सत्तेत येत आहे, म्हणूनच त्यांनी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. त्यांनी माझ्या पोलिंग एजंटला दूर नेले आणि त्याला मतदान करू दिले नाही. खोरियारीमधील ४०४ आणि ४०५ क्रमांकाच्या बूथवरील त्यांचे वर्तन पहा,” असे सिन्हा यांनी घटनेनंतर सांगितले. सिन्हा यांनी केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी केली आणि त्याच गावात निदर्शने करण्याची योजना जाहीर केली. तथापि, पोलिसांनी म्हटले आहे की हा स्थानिक ग्रामस्थांचा निषेध होता आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.
हेही वाचा..
राजद आणि काँग्रेस एकमेकाला खाली खेचण्यात व्यस्त
बनावट बॉम्ब धमकी ईमेल प्रकरणात पोलिसांना यश
सोलर फोटोव्होल्टाइक मॉड्यूल उत्पादन क्षमता वाढणार
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुकिंग सुरु
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू दिली जाणार नाही आणि बिहारच्या डीजीपींना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यापूर्वी सिन्हा यांनी जगदंबा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भेट दिली.
