“आपण आपलाच विक्रम मोडू,” असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी केले होते. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत मराठी मुद्द्यावर नव्याने जोर देत असल्याने अनेकांना शंका वाटत होती. मात्र १६ जानेवारीला राजकीय चाणाक्षपणासाठी ओळखले जाणारे फडणवीस यांनी भाजपसाठी जणू ‘ब्लॉकबस्टर’च दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला जवळपास एकहाती विजयाकडे नेले. ही कामगिरी ‘धुरंधर’सारखीच ठरली. भाजप तब्बल १,२३० जागांवर विक्रमी विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ‘धुरंधर’ चित्रपटाची आतापर्यंतची बॉक्स ऑफिस कमाई १,२१४ कोटी रुपये आहे.
एक वर्षाहून थोड्याच अधिक काळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणणारे फडणवीस हे तळागाळातही प्रचंड लोकप्रिय असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. त्यांच्या शिरपेचातील खरा मानाचा तुरा म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) मोठा विजय—ज्यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवरील ठाकरे कुटुंबाची जवळपास तीन दशकांची सत्ता संपुष्टात आली.
२०१७ पर्यंत अनेक वर्षे भाजप ही अविभाजित शिवसेनेची कनिष्ठ भागीदार होती आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर शिवसेनेची घट्ट पकड होती. आता मात्र भाजप एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरल्याने, पहिल्यांदाच ‘मोठा भाऊ’ बनणार असून स्वतःचा महापौरही भाजपकडे असेल. यामुळे ५४ वर्षीय फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून अधिक ठळकपणे पुढे येतात.
हे ही वाचा:
टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
AI क्षेत्रामुळे आशियाई शेअर्समध्ये तेजी
इराणमधून ३०० भारतीयांसह विमान दिल्लीत पोहचणार
नक्कीच, हा त्या जिद्दी नेत्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे, ज्यांनी अनेक अडथळ्यांनंतरही स्वतःला कायम सिद्ध केले आहे. २०१९ मध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याने सत्ता गेली; २०२२ मध्ये भाजपने शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत एक पाऊल मागे घेतले. तरीही त्यांनी हार मानली नाही. या काळात फडणवीस यांनी भाजपची तळागाळातील संघटना अधिक मजबूत केली. मुंबई आणि उपनगरांमध्ये पक्षाचा विस्तार करत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी त्यांनी शांतपणे भक्कम पायाभरणी केली.
गुजराती आणि उत्तर भारतीयांमधील भाजपचा पारंपरिक मतदारवर्ग त्यांनी घट्ट ठेवला, तसेच दक्षिण भारतीय मतदारांपर्यंतही पोहोच साधली. यासोबतच, ‘मराठी माणूस’ म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करत आणि मुंबईचा पुढील महापौर मराठी हिंदूच असेल, असे आश्वासन देत त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या मराठी मतदारांवरील पकड ढासळवण्याचा प्रयत्न केला.
वेळ आली तेव्हा त्यांनी ते करून दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांचा प्रचार नव्हता. भाजपसाठी त्या क्षणी फडणवीसच ‘मॅन ऑफ द मोमेंट’ होते—रात्रंदिवस मेहनत घेत पक्षाची रणनीती आखणारे.
फडणवीसांची राजकीय वाटचाल
दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना फायदा झाला तो त्यांच्या स्वतःच्या राजकीय प्रवासाचा. वयाच्या २२व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. अवघ्या २७व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले आणि तेव्हापासून नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला ठरला.
जनसंघाचे ज्येष्ठ नेते गंगाधर फडणवीस यांचे पुत्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी १९८९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी संघटनेत—अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत—प्रवेश केला. १९९९ मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि तेव्हापासून त्यांची घोडदौड सुरूच आहे.
फडणवीस यांच्या या यशामागे अनेक कारणे आहेत. इतर अनेक नेत्यांप्रमाणे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. ‘विकासपुरुष’ अशी त्यांची प्रतिमा तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच भावलेली दिसते.
फडणवीसांच्या कार्यकाळात मुंबईला पहिली मेट्रो सेवा मिळाली. मुंबई–नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू पूर्ण झाला. भूमिगत कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे गेले. १७ हजार कोटी रुपयांचा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. तसेच आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पनाही फडणवीस यांचीच होती.
बीएमसी आणि इतर महानगरपालिकांत भाजपला विजयाकडे नेणारी ही कामगिरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे. मुंबईतील ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणे हे त्यांनी अशक्यप्राय वाटणारे करून दाखवले आहे. यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकांकडे पाहताना फडणवीस आणि भाजप दोघांच्याही राजकीय शक्यतांना नवी उभारी मिळेल.