आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जमीन अधिग्रहित केली जात असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार तिथे महाराजांचे भव्य स्मारक उभारणार आहे, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्र्याच्या किल्ल्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी असेही म्हटले की नव्या भारतात मुघलांच्या नावावर कोणत्याही योजनेचे नामकरण केले जात नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजनांना नावे दिली जातात.
बुधवारी संध्याकाळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रा येथे पोहोचले. त्यांच्या आगमनावेळी महिलांनी ढोल-नगारे वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी लाल किल्ला येथे त्यांच्या जीवनावर आधारित लेझर शो आणि नाटक सादर करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या पराक्रम आणि शौर्याचे दर्शन घडविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री सी आर पाटील, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय मंचावर उपस्थित होते.
हे ही वाचा:
करार करा अन्यथा परिणाम गंभीर होतील
एपस्टिन प्रकरणी प्रिन्स अँड्र्यू अटकेत
भारताच्या UPI ने १.४ अब्ज लोकांना दिली डिजिटल ओळख!
महाराष्ट्रातील ‘अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान’ ही संस्था मागील तीन वर्षांपासून १९ फेब्रुवारी रोजी आग्रा किल्ल्यात हा कार्यक्रम आयोजित करत आहे. या आयोजनाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहस आणि शौर्यगाथा जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.
यावेळी कमी वयात १०० किल्ले चढून जाणाऱ्या शर्वीका म्हात्रेचा गौरवही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
